लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारले असून, सध्याची पीक परिस्थिती पावसाळा सुरू असतानाही गंभीर वळणावर आलेली आहे. मराठवाड्यात एकूण अंदाजे ४४ लाख हेक्टर खरीप क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.विभागाची पावसाची सरासरी ७७९ मि. मी. इतकी आहे. सध्या ३२ टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला आहे. २०१५ ते जून २०१६ या काळात केंद्र व राज्य शासनाचे ४ मराठवाडा दौरे झाले होते. मराठवाड्यातील ८ हजार ५२२ गावांतील परिस्थिती तेव्हाही नाजूक होती आणि आता पुन्हा नाजूक होण्याची चिन्हे दिसत आहेत. अद्याप केंद्र व राज्य शासनाने मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला नाही. पुढच्या महिन्यात याप्रकरणी सुरुवात होईल, असा अंदाज आहे.वर्ष २०१५-१६ मध्ये ८ हजार ५२२ गावांत खरीप हंगाम गेल्यानंतर शासनाला मदतीची तरतूद करावी लागली. त्या हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे ४० लाख ५३ हजार ८९८ हेक्टरवर झालेली पेरणी वाया गेली. एक ते दीड हजार कोटी रुपयांची शेतकºयांच्या गुंतवणुकीवर दुष्काळाची कुºहाड कोसळली. परिणामी शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. १ लाख १५ हजार ९१९ हेक्टर क्षेत्राखालील फळबागांचे नुकसान झाले. प्रशासनाने १५ सप्टेंबर २०१५ रोजी खरिपाची हंगामी पैसेवारी जाहीर केली होती. त्यात विभागातील ८ हजार ५२२ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली. खरीप हंगाम ५ हजार ६८४ गावांत तर रब्बी हंगाम २ हजार ८३८ गावांत ग्राह्य धरण्यात आला होता. यंदा विभागात आजपर्यंत ३२ टक्के पाऊस झाला आहे. २०१५-१६ मध्ये सुमारे २१०० कोटी रुपयांपर्यंतची तरतूद खरीप हंगामासाठी करण्यात आली होती. तशीच परिस्थिती यावर्षी निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील खरीप हंगामाची परिस्थिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:20 IST