उस्मानाबाद : केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ झाला आहे. विद्यमान चेअरमन अरविंद गोरे यांचा शेतकरी पॅनल, भाजपा प्रणित बळीराजा पॅनल आणि अॅड. व्यंकट गुंड यांच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये तिरंगी सामना होत आहे. अरविंद गोरे यांच्या शेतकरी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथून करण्यात आला. इतर कारखाने डबघाईस येत असताना शेअर्स विक्रीपासून पक्षीय आणि जातीय राजकारण कटाक्षाने बाजूला ठेवल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखाना भक्कमपणे उभा राहिल्याचे सांगत, विरोधी पॅनलला उमेदवारही मिळाले नसल्याची टीका गोरे प्रचारसभेत करीत आहेत. या प्रचारसभांत शिवाजी साळुंके, चित्राव गोरे, फतेसिंह देशमुख, नामदेव पाटील, उमाकांत माळाळे, सुनंदा डोलारे, साधना भोसले आदींसह पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. भाजपाप्रणित बळीराजा विकास पॅनलच्या वतीने रविवारी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार पाशा पटेल यांनी भूमिका मांडली. कारखान्याच्या गाळपासाठी सभासदाच्या उसाला प्राधान्य देण्याऐवजी बिगर सभासदांचा व कार्यक्षेत्राबाहेरील उसाचा वापर सध्याचे सत्ताधारी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह अॅड. मिलींद पाटील, संजय निंबाळकर, संजय दूधगावकर, रामभाऊ पडवळ, रोहन देशमुख आदी उपस्थित होते. व्यंकट गुंड यांच्या शेतकरी विकास पॅनलनेही शेतकरी सभासदांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. शेतकरी सभासदांना न्याय देण्यासाठी निवडणूक मैदानात उतरल्याचे गुंड यांचे म्हणणे आहे. यावेळी व्यंकटेश हंबीरे, दिलीप जावळे, भुजंग पाटील, ज्ञानदेव राजगुरु, गोविंद कोळगे, सविता शिंदे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
केशेगाव कारखाना निवडणुकीचा फड रंगात
By admin | Updated: March 2, 2015 00:51 IST