ईट : भूम तालुक्यातील गिरवली येथे मंगळवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत कडब्याच्या सहा गंजी खाक झाल्या़ या घटनेत शेतकऱ्यांचे तब्बल २ लाख, ४६ हजार रूपयांचे नुकसान झाले़मिळालेल्या माहितीनुसार, गिरवली येथील काही शेतकऱ्यांनी गावच्या शिवारातील शेतात पशुधनासाठी कडब्याच्या गंजी लावून ठेवल्या होत्या़ या यातील एका गंजीला मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली़ पाहता पाहता इतर पाच गंजींनाही आग लागली़ घटनेची माहिती तातडीने भूम पालिकेच्या अग्नीशमन दलाला देण्यात आली़ अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तास अथक प्रयत्नातून आग अटोक्यात आणली़ मात्र, तोपर्यंत पूर्ण कडबा जळून खाक झाला होता़ यात रघूनाथ गणपती कुंभारकर यांचा २५०० कडबा, विलास गणपती कुंभारकर यांचा १८००, साहेबराव मारूती जाधव यांचा ३०००, तानाजी रघुनाथ कुंभारकर यांचा १५००, मारूती जाधव यांचा २००० तर लक्ष्मण मारूती जाधव यांचा १५०० कडबा जळून खाक झाला़ या घटनेचा तलाठी विकास देशपांडे यांनी पंचनामा केला. (वार्ताहर)
गिरवलीत अडीच लाखांचा कडबा खाक
By admin | Updated: June 11, 2014 00:28 IST