जेहूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गावर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला़ मृतांमध्ये दोघे कन्नड तालुक्यातील जेहूरचे तर अन्य एक निफाड तालुक्यातील आहे.ज्ञानेश्वर रघुनाथ पारधे (वय ३५), कारभारी रावसाहेब रिंढे (वय ६०, दोघे रा़ जेहूर, ता़ कन्नड, जि़ औरंगाबाद) व राजेंद्र गणपतराव जगताप (वय ३०, रा़ तारूखेडले, ता़ निफाड, जि़ नाशिक) यांचा मृतांमध्ये समावेश आहे, तर माया राजेंद्र जगताप (वय ३०) व रेणुका नवनाथ कदम (वय १५, रा़ सुरेगाव, ता़ कोपरगाव) या दोघी जखमी झाल्या़ जखमींना शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे़ पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जेहूर येथील ज्ञानेश्वर रघुनाथ पारधे व कारभारी रावसाहेब रिंढे हे (एम. एच. २०, एल.पी. २२७६) क्रमांकाच्या दुचाकीवरून वैजापूरहून कोपरगावच्या दिशेने येत होते़ त्याचवेळी तारूखेडले येथील राजेंद्र जगताप हे पत्नी माया जगताप व भाची रेणुका कदम हिला घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे नातलगाच्या वर्षश्राद्धसाठी कोपरगावहून वैजापूरच्या दिशेने जात होते़ दोघांच्याही दुचाकी भरधाव वेगाने नागपूर-मुंबई हायवेने कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात असताना गणपती मंदिराजवळ ज्ञानेश्वर जगताप यांच्या वस्तीजवळ समोरासमोर धडकल्या़ दोन्ही दुचाकींचे हँडल एकमेकांत गुंतले गेले़ त्यामुळे ज्ञानेश्वर पारधे, कारभारी रिंढे व राजेंद्र जगताप हे जागीच ठार झाले, तर माया जगताप व रेणुका नवनाथ कदम या दोघी जखमी झाल्या़ सायंकाळी उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रकिया सुरू होती. (वार्ताहर)
जेहूरच्या दोघांसह तिघे जागीच ठार
By admin | Updated: December 13, 2014 00:30 IST