जायकवाडी : जायकवाडी धरण क्षेत्रातील पक्षी अभयारण्यामुळे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणामुळे पुनर्वसित किमान १०० गावे पुन्हा बाधित होणार आहेत. अभयारण्यासंदर्भातील घोषणा होऊन तीन महिने उलटले असून नागरिकांकडून मागविलेल्या आक्षेपाचे काय झाले, पुढील कारवाई काय व कधी होणार अशी भययुक्त चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जायकवाडी धरण क्षेत्र परिसराला पक्षी अभयारण्य क्षेत्र लागू करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने १४ जानेवारी २०१६ ला राजपत्रात घोषणा केली आहे. याबाबत नागरिक व शेतकऱ्यांना आक्षेप मांडण्याची संधी देण्यात आली होती. अनेकांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यावर काय निर्णय घेण्यात आला, याची काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नागरिकांची काळजी वाढली आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात ३४१.०५ किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. या अभयारण्यातील धरणात ६७ प्रजातीचे मासे असून विविध २३४ जातींचे पक्षी या धरणावर मुक्कामी येतात. जायकवाडी पक्षी अभयारण्याचे सीमा क्षेत्र ० ते ५०० मीटरपर्यंत आखण्यात आले आहे. यामुळे शेतकरी व नागरिक भयभीत झाले असून सध्या गावागावात इको सेन्सेटिव्ह झोनबाबतची चर्चा चालू आहे. शेतकऱ्यांना आपल्या जमिनी जातात की काय? हा प्रश्न भेडसावत आहे. जायकवाडी धरण तयार होताना परिसरातील १२५ गावातील शेतकऱ्यांच्या लाखो एकर शेतजमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यातच पक्षी अभयारण्य क्षेत्र लागू करण्याच्या हालचालीमुळे पुन्हा शेतकऱ्यांसह नागरिक मानसिक ताणाखाली आले आहेत. धरणग्रस्त कुटुंबे आजही शासकीय योजनांपासून वंचित असतानाच त्यांच्या डोक्यावर इको झोनसारखा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. संबंधित वन विभागाने इको सेन्सेटीव्ह झोन कसा असणार, याबाबत जनतेला अद्यापही समजून सांगितले नसल्याने नागरिकांचा संभ्रम वाढला आहे.
जायकवाडी पक्षी अभयारण्यामुळे नागरिकांची उडाली झोप
By admin | Updated: April 22, 2016 00:52 IST