लोकमत चमू , उस्मानाबाद ‘खाकीची रझाकारी’ काय असते याचा प्रत्यय कनगरा (ता़उस्मानाबाद) येथील ग्रामस्थांना सोमवारी रात्री आला़ दारूबंदीवरून पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थांत हाणामारी झाली़ त्यानंतर पोलिस मुख्यालयातून आलेल्या शेकडो पोलिसांनी रात्री ११़३० वाजल्यापासून मंगळवारी पहाटेपर्यंत दहशतवादी, अतिरेक्यांविरूध्द करण्यात येणार्या कारवाईप्रमाणे ‘कोंबींग’ आॅपरेशन केले़ जनावरांना मारल्याप्रमाणे युवक-वृध्दांना झोडपल्याने ५० जण जखमी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ ग्रामस्थांचा प्रश्न, पोलिसांची रझाकारी आणि त्यानंतर निर्माण झालेली दहशत.. कनगर्यात जागोजागी दिसून आली़ ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर आरोपातून ‘खाकीची रझाकारी’च समोर येते. जवळपास सहा हजार लोकवस्तीच्या कनगरा गावात अवैधरीत्या सुरू असलेली दारूविक्री बंद करावी, यासाठी ग्रामस्थांसह बचत गटाच्या महिलांचा लढा दोन वर्षांपासून सुरू आहे़ ग्रामसभेचा ठराव घेऊन अनेकवेळा बेंबळी पोलिसांना माहिती देण्यात आली. बचत गटाच्या महिलांनीही वारंवार दारूबंदीसाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने पोलिस पाटील वाजिद शेख यांच्या मार्फत दारूविक्री बंद करावी, असे निवेदन रोजी २४ मे रोजी पोलिसांना दिले होते़ नंतर कनगरा येथील महिलांनी बेंबळी पोलिस ठाण्यात जावून दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली होती़ त्यावेळी पोलिसांनी तुम्ही दारू पकडून दाखवा, आम्ही कारवाई करू, दारू नाही सापडली तर तुमच्यावर कारवाई करू, असा इशारा महिलांना दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीद बाजूला ठेवून पोलिसच अरेरावी करू लागल्याने संतप्त महिला तेथून गावाकडे परतल्या़ ग्रामस्थ, महिलांनी सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दारूविक्री करणार्यास मुद्देमालासह पकडून पोलिसांना माहिती दिली़ ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचारी कनगरा येथे गेले़ त्यावेळी ग्रामस्थ, पोलिसांमध्ये दारू सांडण्यावरून बाचाबाची झाली़ पोलिसांनीच पायाने दारू सांडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला़ बाचाबाचीदरम्यान पोलिस कर्मचार्याने एका महिलेचे मंगळसूत्र ओढून मारहाण केल्याने संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांना मारहाण केली़ ही घटना समजताच बेंबळी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेश बनसोडे व त्यांचे सहकारी कनगरा येथे गेले़ मात्र, संतप्त जमावाने त्यांच्यावरही दगडफेक केल्याचे पोलिस म्हणाले़ या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोलिस मुख्यालयातील अधिकारी व शेकडो कर्मचारी कनगरा येथे रात्री साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमारास दाखल झाले़ गावात दाखल होताच कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता रझाकार ज्या प्रमाणे घरात घुसून मारहाण करीत असत़ त्याच प्रमाणे पोलिस कर्मचार्यांनी दरवाजे तोडून घरात घुसून दिसेल त्याला मारहाण केली़ पोलिसांना मारहाण करणारे कोण होते याची साधी चौकशीही न करता ‘खाकीची रझाकारी’ दाखवत दिसेल त्या युवक, वृध्दास घरातून बाहेर काढत बेदम मारहाण करून पोलिसांनी अटक केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ पोलिसांचा धुडगूस सुरू झाल्याने अनेक ग्रामस्थांनी रात्रीतूनच गावाच्या बाहेर पळ काढला़ जिवाच्या आकांताने ओरडणार्या युवक, वृध्दांचा आवाज ऐकून अनेकांच्या मनामध्ये पोलिसांची दहशत निर्माण झाली. पोलिसांचा हा धुडगूस पहाटेपर्यंत सुरू होता़ गावातील लतीफ पठाण या वृध्द दाम्पत्याच्या घराचे दार तोडून आत प्रवेश करत पोलिसांनी धुडगूस घातला़ या घटनेने घाबरलेले पठाण दाम्पत्य सकाळपासून कोठे आहे याचा पत्ता कोणालाच नव्हता़ द्रौपदी दळवी या ७५ वर्षीय वृध्देने पोलिसांपेक्षा निजाम बरा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली़ सुमन गुरव या ७० वर्षाच्या आजी आपल्या कुटुंबासह घरात झोपल्या होत्या़ त्यांच्या घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी माळकरी असलेल्या दोन्ही मुलांना त्यांच्या डोळ्यादेखत जनावरासारखे मारले़ मुलांचा दोष काय, असे विचारणार्या त्यांच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली़ या घटनेने घरातील जानकी गुरव, नागिनी गुरव, पार्थ गुरव ही लहान मुले पूर्णत: घाबरून गेली आहेत़ वडिलांना होणारी मारहाण, ओक्साबोक्शी रडणारी आई हे चित्र पाहून वडिलांचे काय चुकले, पोलिस असे का वागले या प्रश्नाची उकल अद्यापही त्या बालकांना झाली नाही़ १२ मे रोजी लग्न झालेले संपत इंगळे या तरूणासही पत्नीसमोर बेदम मारहाण करून अटक करण्यात आली़ पोलिस दारूच्या नशेत मारहाण करीत होते, असा आरोप अश्विनी इंगळे यांनी केला़ उमदाबी शेख यांचीही अशीच कथा़ घरात झोपलेल्या एकुलत्या एक मुलास अर्धनग्न अवस्थेत बाहेर खेचून मारहाण केली़ पोलिस अधीक्षकांच्या समोरच हा धुडगूस सुरू होता़ त्यामुळे पोलिस अधीक्षकांवरच कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच राजेंद्र इंगळे यांनी केली़ पोलिस कर्मचारीही जखमी कनगरा येथे झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या किशोर रोकडे, अण्णासाहेब भोसले, एस़बी़पवार यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ तर दगडफेकीत सपोनि राजेश बनसोडे यांच्यासह इतर कर्मचारीही जखमी झाले असून, त्यांच्यावर बेंबळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ पोलिस अधीक्षकांना बडतर्फ करा : तावडे अवैध दारूविक्री करणार्यांना पकडून देणार्या कनगरा (ता़उस्मानाबाद) येथील महिला, पुरूषांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची घटना ही पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल अशीच आहे़ या अमानुष मारहाणीचे नेतृत्व करणार्या पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यासह उपअधीक्षक वैशाली कडूकर व इतर पोलिस अधिकारी, कर्मचार्यांची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली़ पं.स.च्या आवारात वयोवृध्द अटकेत असलेल्या आपल्या मुलांना, मित्रांना, नातेवाईकांना पोलिसांनी सोडावे, दोषी पोलिस अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करावी, निवेदन द्यावे आदी विविध कारणांसाठी कनगरा येथील अनेक नागरिक सकाळी पंचायत समितीच्या आवारात बसून होते़ ना चहाचा घोट ना भाकरीचा तुकडा मोडता ही मंडळी एकीकडे गावातील परिस्थिती जाणून घेत होते़ .... अन्यथा उपोषणास बसू दोन वर्षापासून आम्ही दारूबंदीसाठी पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहोत़ सोमवारी रात्री महिलांनी दारू पकडून पोलिसांना बोलाविले होते़ मात्र, दारू पिऊन आलेल्या पोलिसांनी दारू सांडून देत दारू कुठे आहे असा प्रतिसवाल करीत महिलांना मारहाण करण्यास सुरूवात केली़ महिलेवर हात उगारल्यानंतर ग्रामस्थ पोलिसांची आरती करणार काय ? त्यानंतर उस्मानाबादहून आलेल्या पोलिसांनी घराचे दरवाजे तोडून अमानुष बेदम मारहाण करून अटक केली आहे़ पोलिस अधीक्षकांसमोरच हा प्रकार घडला असून, संबंधित अधिकार्यांसह कर्मचार्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही उपोषणास बसू, असा इशारा सरपंच राजेंद्र इंगळे यांनी दिला़ गावात शुकशुकाट कनगरा गावात रात्री पोलिसांची अक्षरश: रझाकारी अवतरविली होती़ पोलिसांच्या रझाकारीत गावातील सहकार्यांच्या आरडाओरडीचा आवाज त्यांच्या कानात घुमत असल्याने त्यांनी घराला कुलूप लावून गायब होणे पसंत केले़ गावात दुपारपर्यंत पूर्णत: शुकशुकाटच होता़ जानेवारी महिन्यापासून उस्मानाबाद जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे़ येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तर चोरट्यांनी ट्रकचालकाचा खून करून मुद्देमाल लंपास केला होता़ जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या कालावधीत जवळपास २९८ चोर्या झाल्या असून, १ कोटी ४४ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे़ मे महिन्यातही जवळपास दररोज कोठे ना कोठे चोरी झाली आहे़ वाढत्या चोर्यांमुळे नागरिकांची झोप उडालेली असताना पोलिसांनी कनगरा येथे नंगा नाच घातला आहे़ त्यामुळे पोलिसांनी सर्वसामान्यांना मारण्यापेक्षा चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत़ अवैध धंदे राजरोस सुरू जिल्हाभरात अवैध दारूविक्री, मुंबई, कल्याण मटका, तिर्रट, सुरट, अवैध प्रवासी वाहतूक आदी विविध अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत़ पोलिसांकडून केवळ किरकोळ कारवाई करण्यात येत असून, कारवाईनंतरही धंदे का तेजीत चालतात हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उपस्थित झाला आहे़ पोलिसांनी अवैध धंदेवाल्यांना अभय देण्याऐवजी अवैध धंदे बंद करून उद्ध्वस्त होणारे संसार वाचवावेत, अशी मागणी होत आहे़ दारूबंदीच्या मागणीकडे दुर्लक्ष कनगरा ग्रामस्थांनी जवळपास दोन वर्षापासून बेंबळी पोलिस ठाण्याकडे दारूबंदीची मागणी लावून धरली होती़ निवेदने, तक्रारी देऊनही पोलिस कर्मचार्यांनी दारूविक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलले नसल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे़ दारूविक्रीसाठी पोलिसांनी आवश्यक ते पाऊल उचलले असते तर हा दुर्दैवी प्रसंग उद्भवलाच नसता, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या़ मुलाला खूप लागलंय... रात्री गावात काय झाले आम्हाला काहीच माहिती नव्हतं़ उशिरा लाईट आल्यानं पाणी भरत होतो़ त्यानंतर अचानक पोलिस आले़ घरात येऊन माझा मुलगा सतीश गुरव व संतोष गुरव यांना मारहाण करीत पकडून नेले़ पोलिसांनी मारहाण केल्याने सतीश याच्या गुडघ्याला मार लागला आहे़ आम्हाला आता त्याच्या गुडघ्याचे आॅपरेशन करावे लागेल, अशी स्थिती दिसत असल्याची माहिती डोळ्यात अश्रू आलेल्या हनुमंत गुरव यांनी दिली़ वडिलांसह भावालाही नेलं... आम्ही रात्री जेवण करून घरात झोपलो होतो़ अचानक पत्र्यावर वाजल्याने व कालवा ऐकू आल्याने वडील व्यंकट धाराव यांनी दार उघडले़ त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह माझा भाऊ नितीन धाराव यालाही पकडून नेले़ त्यांचा काही दोष नाही, पोलिसांच्या आन् गावकर्यांच्या भांडणाबाबतही त्यांना माहीत नव्हतं़ पण पोलिसांनी त्यांना अचानक का नेलं हे मलाही समजू शकले नाही, अशी प्रतिक्रिया नलिन गुरव या युवकाने दिली़ मुलगा भोळसर आहे हो... थकलेलं वय़़़ लोकं काय म्हणतात याकडे लक्ष असलेल्या श्रीमंत इंगळे (वय-७०) यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, माझा मुलगा अशोक इंगळे हा खूपच भोळसर आहे़ शेतातील कामं करतो़ त्याला दहा रूपयांचा हिशोब कळत नाही़ कानाने ऐकू येत नाही़ काल रात्री आम्ही शेतातून आल्यावर जेवण करून झोपलो होतो़ पण पोलिसांनी घरात अचानक घुसून त्याला मारहाण करून बाहेर नेलं़ अंगावर शर्ट नसता त्याला बाहेर काढलं़ मी पुन्हा त्याला शर्ट दिला़ त्याची काहीच कसूर नसताना पोलिसांनी त्याला पकडून नेल्याचे दु:ख इंगळे यांनी व्यक्त केली़ सहभाग नसताना पकडलं... माझे चुलते प्रकाश गायकवाड, भाऊ विलास गायकवाड हे शेतातून आले होते़ जेवण करून ते घरी झोपले होते़ त्यांना गावात झालेल्या गोंधळाची माहिती नव्हती़ पण पोलिसांनी रात्री १२ ते १ च्या सुमारास घराचे दार वाजवून उघडायला लावले़ दार उघडताच त्या दोघांनाही पकडून नेले़ भावाला लई मारलं़ दोघांचाही काहीच दोष नसताना, भांडणात सहभाग नसतानाही त्यांना पकडून नेल्याचे विकास गायकवाड याने सांगितले़
‘खाकी’चा अमानुष अत्याचार !
By admin | Updated: May 28, 2014 00:27 IST