दरवर्षीप्रमाणे यंदाही घाटनांद्रा शिवारातील सत्तर टक्के शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी मिरची पिकाची लागवड केली. नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून मिरची पिकाकडे पाहिले जाते. दिवसेंदिवस घाटनांद्रा शिवारात मिरची लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी हतबल झालेला आहे. तरी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने पुन्हा मिरची लागवड केली. परंतु मागील आठवडाभरात मिरची पिकांवर आता कोकडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मिरची उत्पादक पुन्हा चिंतेत पडला आहे. औषधी फवारणी करूनही उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. झाडे वाचवण्यासाठी या पिकावर नेमक्या काय उपाययोजना कराव्या, याबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
---
आमच्या शिवारातील मिरची पिकावर मोठ्या प्रमाणावर कोकडा रोग पडत असल्याने झाडे सुकून चालली आहेत. त्यामुळे सुकलेल्या झाडांना मिरची लगडत नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने गावागावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी वाढली. - भागवत मोरे, शेतकरी
---
वातावरणात बदल होताच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. शेतकऱ्यांनी निंबोळी अर्कची फवारणी केली. त्याचबरोबर रासायनिक औषधांच्या फवारण्या कराव्या. कोणती औषधी वापरली पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. - अजय राठोड, कृषी सहायक.
280621\img-20210626-wa0023.jpg
घाटनांद्रा शिवारातील मिरची पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला.