गंगामसला : नगदी पिके घेऊन आर्थिक व्यवहार जलदगतीने करण्यास शेतकरी आता पुढे येऊ लागला आहे. पूर्वी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. मात्र आता सोयाबीन, कापूस, ऊस या नगदी पिकांमुळे तुरीचा पेरा घटला आहे.गत चार ते पाच वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अगोदरच संकटात सापडलेला शेतकरी आता दुष्काळाला तोंड देऊ लागला आहे. पिके हातून गेल्याने आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहेत. माजलगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी नगदी पिके घेऊन आर्थिक व्यवहार गतीमान केल्याचे चित्र दिसून येत आहे.यावर्षी माजलगाव तालुक्यातील गंगामसला परिसरातील एकूण ४ हजार १२६ हेक्टर क्षेत्रापैकी ८८६ हेक्टर एवढा पेरा कमी झाला आहे. या पेऱ्याचे कमी होण्याचे कारण केवळ दुष्काळजन्य परिस्थिती आणि तुरीवर होणारे विविध रोग हेच असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.तुरीचे पीक हे पारंपरिक पीक म्हणून घेतले जाते. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे तुरीचा पेरा केला जायचा. मात्र आता तुरीऐवजी सोयाबीन, कापूस ही नगदी पिके घेण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे. कापसाच्या माध्यमातून जास्त पैसा मिळत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. तुरीवर कीड पडल्यानंतर मोठा तोटा सहन करावा लागतो. सर्वसामान्य शेतकऱ्याला हा तोटा सहन होणारा नसतो, त्यामुळे कमी शेती असणारे शेतकरीही आता नगदी पिके घेण्यास पसंती देऊ लागले आहेत. आहे त्या पिकांना भाव देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
कापूस, ऊस, सोयाबीनमुळे तुरीकडे दुर्लक्ष
By admin | Updated: December 12, 2014 00:54 IST