इंडिगोने सोमवारपासून दिल्लीची विमानसेवा सुरू केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हैदराबादचीही विमानसेवा सुरू झाली. हैदराबादहून या विमानाने ४६ प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले, तर औरंगाबादहून ७४ प्रवासी हैदराबादला गेले. छोट्या एटीआर विमानाद्वारे ही सेवा दिली जात आहे. औरंगाबादहून हैदराबादला रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. रेल्वेबरोबर हैदराबादला हवाई कनेक्टिव्हिटीही मिळाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इंडिगोने ही विमानसेवाही तात्पुरती रद्द केली होती. परंतु आता पुन्हा एकदा औरंगाबादला रेल्वेबरोबर हैदराबादची हवाई कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. आठवड्यातून चार दिवस ही विमानसेवा राहणार आहे. पुढील आठवड्यात मुंबईसाठीही विमान सुरू होणार आहे. गेले काही दिवस औरंगाबादहून केवळ एअर इंडियाची विमान सेवा सुरू होती आणि त्याद्वारे शहराची मुंबई आणि दिल्लीला हवाई कनेक्टिव्हिटी कायम राहील. इंडियासह आता इंडिगोची दिल्ली आणि हैदराबादची विमानसेवाही उपलब्ध झाली आहे.
बंगळुरू, अहमदाबाद विमानसेवेची प्रतीक्षा
इंडिगोने बंगळुरू आणि अहमदाबाद विमानसेवाही पुन्हा एकदा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या दोन्ही विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे आता ही दोन्ही विमाने पुन्हा कधी सुरू होतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.