औरंगाबाद : भास्कर मोरे (२९, रा. बोलटेक, ता. कन्नड) याच्या हातून पत्नी कविता मोरेचा भांडणामध्ये खून झाला होता. प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. कोल्हे यांनी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.१९ सप्टेंबर २०१३ रोजी भास्कर मोरे आणि पत्नी कविता मोरे (२२) यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यामध्ये भास्करने कविताला फुकणीने छातीवर मारले. त्यामुळे कविता जखमी होऊन बेशुद्ध पडली. त्यानंतर भास्करने शेजारी राहणाऱ्या शीलाबाई रमेश गायकवाड यांना कविता उलट्या होऊन बेशुद्ध पडल्याचे सांगितले. शीलाबार्इंनी कविताला दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली. कन्नड उपजिल्हा रुग्णालयात कविताला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी कन्नडचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दत्तात्रय भातनाते यांनी सरकार पक्षातर्फे भास्कर मोरेविरुद्ध कन्नड पोलीस ठाण्यात ३०२ चा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान कविताच्या डाव्या बाजूच्या छातीच्या ५ आणि ७ नंबरची फासळी मोडल्याने रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फौजदार भातनाते, डॉ. गीते, डॉ. दाभाडे आणि शीलाबाई यांची साक्ष झाली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ३०२ मधून मुक्त करून ४०२ (२) नुसार सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात भास्कर मोरेला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
पतीला पाच वर्षांची सक्तमजुरी
By admin | Updated: January 20, 2015 01:28 IST