सोमनाथ खताळ , बीडपाहणी न करताच ओळखीने बांधकाम परवाने द्यायचे आणि तक्रार आली की ती प्रलंबीत ठेवायची. एखाद्याने आवाज उठवला तर नोटीस दिल्याचे नाटक करायचे आणि पुन्हा जैसे थे कारभार चालवायचा,हा प्रकार आता पालिकेसाठी नवीन राहिलेला नाही. वर्षभरात शेकडो बांधकामे अनधिकृतपणे असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही पालिका त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे.शहरातील प्रत्येक मुख्य रस्ता हा १२ मिटरच्या जवळपास रूंद असल्याचे नोंद दप्तरी आहे. प्रत्यक्षात मात्र हे रस्ते निम्म्याच्यावर ढापण्यात आलेले आहेत. अनाधिकृतपणे तीन-चार मजली टोलेजंग इमारती उभारूनही त्यांच्यावर पालिका कसलीच कारवाई का करत नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे नागरीकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असतानाही या अनाधिकृत बांधकाम धारकांना पाठिशी घालण्याचा प्रकार संबंधीत कर्मचारी करीत असल्याचा आरोप मनविसेचे शैलेष जाधव यांनी केला आहे. अनाधिकृत बांधकामे किती झाली याचा सर्व्हे प्रत्येक वर्षी होतो. केवळ सर्व्हे न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.
अनधिकृत बांधकामे शेकडो; कारवाई शून्य
By admin | Updated: December 24, 2014 01:02 IST