औरंगाबाद : शहर विकास आराखड्यावर सुनावणी घेण्यासाठी शासनाने चार शासकीय सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर गुरुवारपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे सुनावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या समिती सदस्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबविण्यात आले आहे. या समितीचा संपूर्ण खर्च मनपा पदाधिकारीच करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.सहा महिन्यांपूर्वी शासनाने मनपाकडे शहर विकास आराखडा सादर केला होता. सर्वसाधारण सभेने आमूलाग्र बदल करून आराखडा प्रसिद्ध केला. आराखड्यावर सुमारे अडीच हजार नागरिकांनी आक्षेप नोंदविले. खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी चार शासकीय सदस्य तर तीन निमशासकीय सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण ७ जणांची समिती २३ जूनपासून सुनावणी घेणार आहे. चार दिवसांपासून मनपाचे पदाधिकारी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे तळ ठोकून आहेत. पदाधिकाऱ्यांनी मुंबईहून आलेल्या तज्ज्ञांची पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे. समितीला काय हवे किंवा नको हे पाहण्याचे काम प्रशासनाचे असताना पदाधिकारीच पाहुणचार करीत आहेत. मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी शहर विकास आराखड्यात नियमबाह्य पद्धतीने अनेक बदल केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आराखड्याची सुनावणी आजपासून
By admin | Updated: June 23, 2016 01:35 IST