कळंब : कळंब येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वीजपुरवठा देयक न भरल्यामुळे महावितरणने खंडित केला आहे. यामुळे सोमवारी दिवसभर या कार्यालयात दस्तनोंदणी होऊ शकली नाही. या प्रकारामुळे दस्तनोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.कळंब येथील मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय आहे. याठिकाणी तालुक्यातील जागा, जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराचे दस्त नोंदणी होतात. विशेष म्हणजे कार्यालयाचे संगणीकरण झालेले असून विशिष्ट प्रणालीद्वारे दस्त नोंदवले जातात. सोमवारी तर या कार्यालयात दस्त नोंदणी करणारांची अधिक संख्या असते. परंतू दस्तूरखुद्द या कार्यालयाचाच वीजपुरवठा देयक न भरल्याने महावितरणने खंडित केल्याने सोमवारी कामकाजावर विपरित परिणाम झाला. तसेच दस्त नोंदणीसाठी आलेल्या लोकांची गैरसोय झाली. महावितरणने जवळपास ६२ हजार रुपयाचे दिलेले देयक न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती.यासंदर्भात सोमवारी दुय्यम निबंधक कळंब यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वीजपुरवठा खंडित झाला यास दुजोरा देऊन कामकाजावर परिणाम मात्र झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर किती दस्त नोंदणी झाली अशी विचारणा केली असता, कार्यालयात या माहिती देतो असे म्हणून धनादेश आज देणार असल्याचे सांगितले. तर महावितरणचे कनिष्ठ अंभियता वाय.जे.उटीकर यांनी ६२ हजाराच्या आसपास असलेले देयक न भरल्याने वीज पुरवठा तीन दिवसापूर्वीच खंडित केला असून, सोमवारी उशिरापर्यंत धनादेश प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दस्तनोंदणीचे काम विजेअभावी ठप्प
By admin | Updated: March 31, 2015 00:37 IST