परळी : येथील पंचायत समिती कार्यालयात बुधवारी राज्याच्या ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जनता दरबार भरविला. यामध्ये सामान्यांची गाऱ्हाणी त्यांनी ऐकून घेतली.भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, उप जिल्हाधिकारी सविता चौधर, उप विभागीय अधिकारी मंदार वैद्य, तालुकाध्यक्ष जीवराज ढाकणे, नामदेव आघाव, वृक्षराज निर्मळ, सभापती विद्यावती गडदे, उपसभापती प्रा. बिभीषण फड यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्र्यांनी सामान्यांचे विविध प्रश्न जाणून घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. उपस्थित ग्रामस्थांमधून आलेल्या थेट प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. टंचाईचा काळ असल्याने प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी सज्ज रहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. पाणी, चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार उपलब्धतेसाठीही प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी सोबतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा परिचय करून देऊन कामे त्यांच्याकडे सोपवा, असे सांगितले. यावेळी मागण्यांचे निवेदनही विविध ग्रामस्थांनी त्यांना दिले. (वार्ताहर)
पालकमंत्र्यांचा जनता दरबार
By admin | Updated: January 8, 2015 00:59 IST