लोहारा : शेतकर्यांची आर्थिक लूट होऊ नये, या उद्देशाने येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. येथे चांगला दर मिळत असल्याने शेतकरी या केंद्रावरच माल घालत होते. परंतु, १० मे पासून खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. पर्याय नसल्याने शेतकरी हा माल आता खाजगी व्यापार्यांच्या आडतीवर घालताना दिसून येत आहे. ही संधी साधत व्यापारीही शेतीमाल कमी दराने खरेदी करीत आहेत. लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हरभरा, तूर, मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. विशेष म्हणजे येथे शासनाच्या मालकीचे गोडावूनही नव्हते. मात्र, यातून मार्ग काढीत एका शेतकर्याचे गोडावून किरायाने घेतले. या हमीभाव केंद्रावर शेतीमालाला बाजारपेठेपेक्षा उत्तम दर मिळत गेल्याने शेतकर्यांची आर्थिक लूट थांबण्यास मदत झाली. विशेष म्हणजे शेतीमाल खरेदी केल्यानंतर संबंधित शेतकर्यांना महिनाभराच्या आता पैसेही मिळत होते. तालुक्यामध्ये हरभर्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या केंद्रावर आजवर तब्बल १३ हजार क्विंटल हरभर्याची आवक झाली. विशेष म्हणजे, बाजारपेठेत २३०० तर केंद्रावर ३ हजार १०० रूपये दर मिळाला. या माध्यमातून शेतकर्यांचा प्रति क्विंटल ७०० ते ८०० रूपयांचा फायदा झाला. दरम्यान, सदरील हरभरा खरेदी केंद्र १० मे पासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रावर आजही अनेक शेतकर्यांचा हरभरा पडून आहे. शासनाने हे केंद्र काही दिवसांसाठी पुन्हा सुरू करावे, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. याबाबत सभापती दिनकरराव जावळे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लोहारा येथील खरेदी केंद्रावर कधीही व्यापार्यांना थारा दिला नाही. त्यामुळेच तूर, मकासह आदी शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली. आजूनही हजारो क्विंटल पडून असल्याने खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
हरभरा हमी भाव खरेदी केंद्र बंद !
By admin | Updated: May 17, 2014 00:17 IST