उस्मानाबाद : थकित अनुदानाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, मंगळवारी दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना फुले आणि भाजीपाला देवून गांधीगिरी केली. जिल्ह्यातील जरबेरा लागवड, हरितगृह, शेडनेट, शेततळे, शेततळे स्पील, पॅक हाऊस, कांदाचाळ, यांत्रिकीकरण आदी घटकांसाठी सन २०१५-१६ या वर्षातील ५४८ शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेकडून लाखो रूपयांचे कर्ज उचलले आहे़ मात्र, अनुदान मिळत नसल्याने बँकेचे कर्ज थकीत गेले असून, लाखो रूपयांच्या व्याजाचा भुर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे़ निधी अभावी या शेतकऱ्यांचे १८ कोटी रूपये अनुदान थकीत असून, हे अनुदान मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे़ या आंदोलनात सागर रणदिवे, शेषेराव पवार, धनराज गाते, राजेश्वर मसे, विशाल साठे, अच्यूत गुंड, रत्नाजी गुंड, देवराव पवार, प्रमोद आगळे, कैलास पाटील, लक्ष्मीकांत ताड, प्रदीप रणखांब, सुजित पवार, प्रशांत रणखांब, अनुसया माळी, मनोहर पवार, अरूण वरकंडे, विरभद्र शिराळ, आदी शेतकरी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
शासकीय कार्यालयांत शेतकऱ्यांनी केली गांधीगिरी
By admin | Updated: December 27, 2016 23:55 IST