बीड : शिट्टी वाजली.. मला राग येतोय... मुंगळा मुंगळा... ब्राझील... पाणी पाणी पाणी... कोंबडी पळाली.. देव धनगर वाड्यात घुसला... यासारख्या हिंदी, मराठी गितांवर थिरकलेल्या भक्तांनी सोमवारी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर या...! अशी विनंती करत जड अंत:करणाने भाविक गणरायाचे विसर्जन करताना दिसून आले. दरम्यान बंदोबस्ताला असलेल्या पोलीसांच्या नाकावर टिच्चून डॉल्बी वाजवून ध्वनीच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या. पेठबीडमध्ये नाचण्यावरुन दगडफेक झाली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. मिरवणुकीत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. महिला, मुलींनीही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली. गर्दी पाहून भक्तांचा उत्साह आणखीनच वाढत होता. त्यामुळे दिवसभर मनमुरादपणे भक्तांची पाऊले थिरकली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री १० ला थांबली. ठिकठिकाणच्या मिरवणुकांमध्ये गुलालाची उधळण करण्यात आली. त्यामुळे भक्तांसह मिरवणूक मार्ग लालेलाल झाला होता.बीडमधील हिरालाल चौकामध्ये प्रत्येक गणेश मंडळांनी ‘ब्रेक’ डान्स केला. एकमेकांना डोक्यावर उचलून नाचताना उडालेली तारांबळ आणि वर फेकल्यानंतर झेलता न आल्याने पडल्यानंतर लागलेला मार सहन करीत हसत हसत पुन्हा उभा राहून तेवढ्याच जोशात नाच करीत होते. कंकालेश्वर परिसरात विसर्जनशहरातील ठिकठिकाणाहून मिरवणूका काढण्यात आल्या. दिवसभर मिरवणूका झाल्यानंतर शहरातील कंकालेश्वर मंदिराच्या ठिकाणी पालिकेच्या वतीने ठरवून दिलेल्या विहिरीत गणेशाचे विसर्जन करण्यात आले.गेवराईत चिंतेश्वर मंदिराजवळ विसर्जनशहरात ४२ गणेश मंडळांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. शहरातील चिंतेश्वर मंदिराजवळील विहिरीत तर काहींनी शहागड येथील गोदावरी नदीमध्ये गणरायाचे विसर्जन केले. मिरवणुका काढण्यात आल्या. गणेशभक्तांची मोठी गर्दी होती.धारूरमध्ये ढोल- ताशांचा आवाजतालुक्यात ७८ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली होती. सकाळपासूनच मिरवणुका काढून ढोल-ताशांच्या आवाजात गणरायाला निरोप दिला. पालिकेसमोरील मध्यवर्ती तलावामध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत देखावे सादर करण्यात आले. वडवणीत ज्ञानोबा माऊलींचा गजरशहरात व तालुक्यात ठिकठिकाणी गणरायाचे शांततेत विसर्जन करण्यात आले. अनेक गणेश मंडळांनी टाळ- मृदंगाच्या साह्याने ज्ञानोबा माऊलीचा गजर करत लाडक्या गणरायाला निरोप दिला. यावेळी पोलीस बंदोबस्त होता. माजलगावमध्येही मिरवणुका तालुक्यात पोलीस बंदोबस्तात मिरवणुका शांततेत पार पाडण्यात आला. निघालेल्या मिरवणुका सायंकाळी संपल्या. शेवटची आरती करून गणरायाचे विसर्जन करण्यात आले. परळीत भक्तांची गर्दीशहरातील गणेशपार भाग, वैद्यनाथ मंदिररोड परिसरात मिरवणुका पाहण्यासाठी भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. ढोल- ताशांचा आवाज आणि डी.जे.च्या तालावर तरूणाई फक्त डान्स करण्यात तल्लीन झाली होती. अंबाजोगाईतही शांततेत विसर्जनढोलताशांच्या गजरात अंबाजोगाईकरांनी गणरायाला निरोप दिला. अंबाजोगाई शहरात २७ गणेश मंडळाच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या होत्या.रात्री उशिरा रविवारपेठेतील तलावात सर्व गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचे विर्सजन केले. येथील शिवाजी चौकात नगर परिषदेच्या वतीने सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत राजकिशोर मोदी यांनी केले. गणेश मंडळांनी विविध देखावे व पारंपारिक खेळप्रकार या ठिकाणी सादर केले. गणपती विर्सजनाची मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील महिला व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मुस्लिम बांधवांकडून आरतीबीड तालुक्यातील पिंपळनेर येथे विसर्जन मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी उत्साहात सहभाग नोंदविला. मसजिदजवळ मिरवणूक आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी गणरायाची स्वागत करत आरती केली. यावेळी नाचगाण्यातही बांधवांनी सहभाग घेतला. मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी झाल्यामुळे हिंदु- मुस्लिम एकतेचे दर्शन यातून घडले. (प्रतिनिधींकडून)
‘शिट्टी’च्या तालावर बाप्पाला निरोप
By admin | Updated: September 10, 2014 00:48 IST