औरंगाबाद : शहर विकास आराखड्यावर अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी आक्षेप दाखल केले आहेत. आक्षेपांवर सुनावणी घेण्याचे काम गुरुवारपासून मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुरू आहे. शुक्रवारीही १४७ नागरिकांच्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली.मागील वर्षी शासनाने मनपाकडे शहर विकास आराखडा सुपूर्द केला. मनपा सर्वसाधारण सभेने या आराखड्यात मोठ्या प्रमाणात दुरुस्त्या केल्या. त्यानंतर नागरिकांसाठी आराखडा प्रसिद्ध केला. अनेक नागरिकांवर अन्याय करणारा हा आराखडा ठरला. आराखडा अत्यंत चुकीचा असल्याचे सांगून काही नागरिकांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना मनपाने गुरुवारपासून आक्षेपांवर सुनावणी घेण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी मौलाना आझाद संशोधन केंद्रात अलोट गर्दी केली होती. माजी उपमहापौर संजय जोशी, माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी संपूर्ण आराखड्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मिटमिटा येथील गट नंबर ९४ मधील नागरिकांच्या अनेक घरांवर शैक्षणिक आरक्षण टाकण्यात आले आहे. तब्बल ४२ जणांनी समितीवर प्रश्नांचा भडिमार केला. पडेगाव येथील गौतम पवार हौसिंग सोसायटीवर मनपाच्या वतीने डीपी रस्त्याचे आरक्षण टाकले आहे. हा रस्ता केवळ कत्तलखान्यापर्यंत असून, त्याचा कोणताही फायदा नागरिकांना होणार नसून, हे चुकीचे आरक्षण टाकण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. शासकीय सदस्य म्हणून नगररचना विभागाचे सेवानिवृत्त सहसंचालक अ. रा. पाथरकर, नगररचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक प्र. ते. महाजन, वास्तुविशारद अश्विनी अमोल गंभीर, पर्यावरण तज्ज्ञ दिलीप यार्दी, तीन अशासकीय सदस्यांमध्ये नगरसेवक राज वानखेडे, गजानन मनगटे आणि अजीम खान, वसंत निकम यांची उपस्थिती होती.
दुसऱ्या दिवशीही औपचारिकता
By admin | Updated: June 26, 2016 00:40 IST