अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईसलग तीन वर्षांपासून पडणारा अपुरा पाऊस यामुळे तालुक्याला दुष्काळाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापासून निर्माण झालेली पाणीटंचाई व चाऱ्याचा प्रश्न यामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागले आहे. ऊसतोडीसाठी गेलेल्या कामगारांच्या पाठोपाठ शेतकरी व शेतमजूर आपली जनावरे घेऊन गावोगावी फिरत असल्याने तालुक्यातील अनेक गावे आता ओस पडू लागली आहेत. अंबाजोगाई तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडू लागल्याने सर्वत्र जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. गेल्या दोन वर्षांत एकही मोठा पाऊस न झाल्याने नद्या, तलाव यांचे पाणी वाहिले नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील डोंगराळ भागात तर सध्या चारा व पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील चिचखंडी, येल्डा, कुरणवाडी, राक्षसवाडी, हडंगवस्ती, मंगयीवाडी, या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ऊसतोडीसाठी गेले आहेत. त्या पाठोपाठ आता गावातील उर्वरित शेतकरी व शेतमजुरही चारा व पाण्याअभावी स्थलांतर करू लागले आहेत. अगोदरच खरीप हंगामही पावसाअभावी संकटात सापडला. त्यामुळे सोयाबीन, बाजरी, संकरित ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली. परिणामी जनावरांसाठी कडबा राहिला नाही. पिण्यासाठी पाण्याचीही उपलब्धता नाही. अशा स्थितीत पशुधन जगवायचे कसे? या भेडसावणाऱ्या समस्येमुळे शेतकऱ्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढू लागले आहे. या संदर्भात अद्यापही प्रशासकीय पातळीवर ठोस उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. डोंगर परिसरातील गावांमध्ये शासनाच्या वतीने चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी चिचखंडी येथील सरपंच गुणवंत बिरगड यांनी केली आहे. यासंदर्भात ठोस उपाययोजना न आखल्यास तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागेल, अशी प्रतिक्रिया बिरगड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. सध्या जिल्ह्यात सर्वत्रच अशी परिस्थिती दिसून येत आहे.
चारा, पाण्याअभावी जनावरांचे स्थलांतर
By admin | Updated: December 12, 2014 00:54 IST