सुमेध वाघमारे, तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेरची ऐतिहासिक वारसा संपन्न गाव म्हणून ओळख आहे. या गावाला राजकीय वारसाही लाभलेला आहे. तेरचे सुपूत्र डॉ. पद्मसिंह पाटील यांनी १९७४ ला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले. तेव्हापासून ते आजतागायत राजकारणात सक्रीय सहभाग आहेत. आता येथीलच राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. सिंचन, आरोग्यसह पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासाचे येथे भरीव काम झाले आहे. दरम्यान, गावातील हद्दवाढ भागात आजही रस्ता व नाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळेच तेर येथे पहिल्यांदा विशेष बाब म्हणून ग्रामिण रुग्णालय उभारले गेले. त्यापूर्वी ग्रामिण रुग्णालय केवळ तालुका ठिकाणीच उभारण्यात येत असत. या रुग्णालयासाठी डॉ. पाटील यांनी त्यांच्या स्वत:च्या मालकीची जमीन दिली. याबरोबरच तेरमध्ये चांगल्या प्रकारचे बसस्थानकही डॉ. पाटील यांच्यामुळेच उभे राहू शकले. गावामध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते, पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्या माध्यमातून या क्षेत्राततही लक्षवेधी काम झाल्याचे दिसून येते. तेरणा धरणातून गावाच्या पाईपलाईनव्दारे गावात पाणी पुरवठा करण्यात येतो. या बरोबरच १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची सोयही गावात उपलब्ध आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राणाजगजितसिंह पाटील हे निवडून आले आहेत. यापूर्वी राज्यमंत्री असताना तेरणा धरणातून शेतकऱ्यांसाठी बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना उभाण्यात त्यांना यश आले. यामुळे कॅनॉलद्वारे होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळणे हा हेतू होता. मात्र मागील दोन पावसाळे कोरडे गेल्याने पुरेशा पाण्याअभावी या योजनेचा सध्या लाभ होत नाही. गावामध्ये संत गोरोबा काकांचे राहते घर, बौद्ध स्तूप यांना गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी आणणे, गोरोबा काका यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी व मंदिराला ‘ब’ दर्जा मिळण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. तेरणा नदीवर (शिरपूर पॅटर्न) सरळीकरण व खोलीकरणाचेही मोठे काम करण्यात त्यांना यश आले आल्याचे गावात फेरफटका मारला असता दिसून येते. विविध विकासकामे करण्यात यश आले असले तरी, गावातील हद्दवाढ भागात आजही रस्ता व नाल्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. गावातील काही भागात आजही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून व्यापारी संकुलाची उभारणी करावी अशी मागणी असली तरी मुबलक गाळे उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सिंचन, आरोग्यसह पायाभूत सुविधांवर भर
By admin | Updated: March 15, 2015 00:37 IST