संजय तिपाले ,बीडपोटाचे खळगे भरण्यासाठी स्थलांतरित होणाऱ्या सहा लाख मजुरांना ऊसाच्या फडात अतिशय कष्टाची कामे करावी लागतात. आजारपण असो की महिलांचे गरोदरपण या काळात आराम तर दूरच;परंतु कोयता बाजूला सारुन भागत नाही. तब्बल पाच हजाराहून अधिक महिलांना गरोदरपणातच कोयत्याशी झुंजावे लागते. उल्लेखनीय म्हणजे दरवर्षी २५ हजारावर पाल्यांच्या शिक्षणाचीही वाताहत होते. त्यामुळे बापाच्या हातातील कोयता मुलाच्या हाती येतो अन् पुढे पिढ्यान्पिढ्या हे दुष्टचक्र सुरुच राहते.ऊसतोड मजूर अन् संघर्ष हे जणू समीकरणच बनले आहे. घाम गाळल्याशिवाय दाम नाही अशी स्थिती असलेल्या मजुरांना आपल्या कुटुंबासह रात्रंदिवस काबाडकष्ट उपसावे लागतात. स्थलांतरामुळे नातेवाईकांची ताटातूट तर होतेच;परंतु महिलांना मातृत्वाचे सुखही पुरते उपभोगता येत नाही. गरोदरपणात एकीकडे आराम व सकस आहार आवश्यक असल्याचे सांगितले जाते;परंतु ऊसतोड मजुरांना या सुख- सुुविधांपासून वंचित रहावे लागते. गतवर्षी ऊसतोडीसाठी स्थलांतरित झालेल्या मजुरांमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक महिला गरोदर होत्या, अशी माहिती आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणातूनच पुढे आली आहे.
पाच हजार महिलांच्या हाती गरोदरपणात कोयता
By admin | Updated: October 28, 2014 00:59 IST