वैजापूर : क्षुल्लक वादावरून तालुक्यातील धोंदलगाव येथील एका २७ वर्षीय तरुणाचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.ए. कोठेकर यांनी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर ३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.रवींद्र रखमाजी आवारे १९, बाळू विश्वनाथ डमाळे २६, सचिन दौलत चौधरी २१, दत्तू ऊर्फ दत्तात्रय आवारे २५, गणेश कारभारी साठे २८, सर्व रा. धोंदलगाव अशी जन्मठेप सुनावलेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील धोंदलगाव येथे सर्कस सुरू होती. या खेळाच्या ठिकाणी १५ डिसेंबर २०११ रोजी भगवान सोळस व रवींद्र आवारे यांच्यात बाचाबाची झाली होती. भगवान हा आपला मित्र विकास भालेरावसोबत १६ डिसेंबर २०११ रोजी सर्कशीचा खेळ पाहून घरी जात असताना रवींद्र आवारे, बाळू डमाळे, सचिन चौधरी, दत्तू ऊर्फ दत्तात्रय आवारे, गणेश कारभारी साठे, सचिन चन्ने, रखमाजी आवारे व ललिता आवारे यांनी भगवान यास अडवून बेदम मारहाण केली. त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी संदीप अण्णा सोळस याने दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर ठाण्यात आठ जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अधिकारी रमेश घोराळे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. शिवाजी नवले व सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी काम पाहिले.
खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेप
By admin | Updated: January 4, 2015 01:13 IST