उस्मानाबाद : टंचाई निवारणार्थ टँकरसोबतच शेतकऱ्यांच्या जलस्त्रोतांचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. परंतु, त्याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून रोष व्यक्त होत आहे. मार्च २०१५ पूर्वीचे पैसे आजपावेतो मिळालेले नव्हते. हा प्रश्न पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या तातडीच्या आढावा बैठकीतही चर्चिला गेला होता. त्यावर हा निधी उपब्ध करून देवू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मार्चअखेरपर्यंतचे २ कोटी २ लाख ५८ हजार रुपये उपलब्ध झाले असून वाटपही सुरू करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. गतवर्षी तर ऐन हिवाळ्यातच काही गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मार्चपूर्वी तब्बल पावणेतीनशे जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावांची तहान भागविली जात होती. संबंधित शेतकऱ्यांना अधिग्रहणाचा मोबदला तातडीने मिळने अपेक्षित असते. परंतु, येथे घडले उलट. मार्च २०१५ अखेरपर्यंतचे संबंधित शेतकऱ्यांना तब्बल २ कोटी २ लाख रुपये देणे आवश्यक होते. परंतु, ते मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या अनेक बैठकांमध्येही हा विषय चर्चेला आला होता. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री डॉ. सावंत यांनी दुष्काळ निवारणार्थ करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीतही आ. मधुकरराव चव्हाण, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. अधिग्रहणाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने दुसरे स्त्रोत अधिग्रहित करताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पालकमंत्री डॉ. सावंत यांनी याबाबत लवकरच तोडगा काढून अधिग्रहणाचे पैसे उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार तीन-चार दिवसांपूर्वी मार्च २०१५ पूर्वीचे २ कोटी २ लाख ५८ हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाले आहेत. त्याचे वाटपही सुरू करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
...अखेर अधिग्रहणाचे २ कोटी मिळाले
By admin | Updated: July 27, 2015 01:10 IST