पाटोदा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र अर्थार्जन मिळावे या करीता शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता. राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक विमा स्वीकारला जात नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बँकेच्या आडमुठेपणाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.दुष्काळी स्थितीमध्ये धास्तावलेल्या शेतकऱ्यांना एका बाजूस मदत दिली जाणार असल्याच्या घोषणांचा पाऊस पडत आहे. मात्र प्रत्यक्षात ही मदत केंव्हा मिळेल याबाबत साशंकता आहे. गतवर्षी पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांचा मोठ्या प्रमाणावर विमा उतरविला होता. त्यामधून नुकसान झालेल्या पिकांची रक्कम मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगली होती. त्याचा बँकांनाही बऱ्यापैकी फायदा झाल्याचेही दिसून आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी रुपये एवढा निधी मिळाला. यंदाच्या खरीपाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठी जोखीम स्वीकारली. पीक विम्याच्या किचकट नियमावलीबाबत साशंकता असतानाही जवळपास १ कोटी रुपये हप्त्यापोटी बँकेत भरणा केले आहेत. कृषी विभागाने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरावा म्हणून आवाहन केले होते. तर दुष्काळामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे. अजूनही ३१ डिसेंबर पर्यंत पीक विमा उतरविला जाणार आहे. पीक विमा कुठल्याही बँकेत जमा करता येतो. मात्र शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतच खाते असल्याने या बँकेकडेच ओढा वाढला आहे. येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पीक विमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना विमा स्वीकारला जात नसल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे अगोदरच दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांची राष्ट्रीयकृत बँकेकडूनही अवहेलना होत आहे. अनेक वेळा खेटे मारूनही पीक विम्याबाबतचे काम पूर्ण केले जात नाही. विम्याबाबतच्या किचकट प्रक्रियेची शेतकऱ्यांकडून पुर्तता केली जात आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांकडून त्याला योग्य असा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून दुरावलेले आहेत. ३१ डिसेंबर ही पिक विम्यासाठी शेवटची तारीख असल्याने बँक परिसरात शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. मात्र येथील कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांना निराशेनेच परतीचा मार्ग धरावा लागत आहे. (वार्ताहर)राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी, अधिकारी हे शेतकऱ्यांना तुच्छ वागणूक देत आहेत. तर धनदांडग्यांना कर्ज पुरवठा करत आहेत. हा दुजाभाव शेतकरी आणि इतरांमध्ये केला जात आहे. कर्जमंजुरी असूनही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज वितरित केले जात नाही. - राजाभाऊ देशमुख, सामाजिक कार्यकर्तेपीक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाती पंधरवाडा राहिलेला आहे. पीक विमा उतरवावा याकरीता विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना गळ घातली आहे. विमा उतरविल्यानंतर पुन्हा त्याची पुर्तता होत नसल्याचे यापूर्वी अनेक वेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली होती. पीक विमा काढण्याचा कालावधी संपत आला असताना बँकेचे व्यवस्थापक पीक विमा स्वीकारण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
राष्ट्रीयकृत बँकेतही शेतकऱ्याची अवहेलनाच
By admin | Updated: December 13, 2014 23:35 IST