जालना : गतवर्षी पीक विमापोटी शासनाने ४४ कोटी ६४ लाख रूपयांची मदत दिली. त्याचा मोठा आधार मिळाल्याने यंदाच्यावर्षी सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी १६ कोटी ६१ लाख रूपयांचा पीक विमा उतरविला आहे. यापेक्षाही जास्त नोंदणीची अपेक्षा होती. मात्र महसूल विभागाने पीक विमा नोंदी घेण्यास निष्काळजीपणा केल्याने अनेकांना फटका बसला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पीक विमा उतरवून घेण्यासाठी सर्वच ६४ शाखांमध्ये मोठी मोहीम राबविली.जिल्हा बँकेच्या वतीने ज्या शाखांमध्ये कर्मचारी कमी आहेत.त्याठिकाणी जास्तीची कर्मचारी पाठवून बँकेत आलेला एकही शेतकरी परत जाणार नाही, याची काळजी घेतली. कपाशी पिकासाठी तब्बल २ लाख ५० हजार ते ७५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सर्वच पिकांसाठी विमा उतरविण्याची संधी शासनाने दिली होती. नियोजित वेळेत विमा उतरविण्यात अपयशी ठरलेल्या शेतकऱ्यांही एक संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. जवळपास पिकांना विमा कवच देण्यात आले. महसूल विभागाच्या तलाठ्यांनी यंदाच्यावर्षी केवळ ऊस, कांदा व कापूस या पिकांनाच विमा असल्याचे सांगून शेतकऱ्यांना नोंदी न घेता परत पाठविल्याच्या घटनाही आहेत. जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरणात गांभिर्याने विचार करून कारवाई केल्यास पुन्हा एकदा वंचित शेतकऱ्यांना लाभ घेता येईल, असे वंचित शेतकरी गोपीचंद जटावाले यांनी सांगितले. आतापर्यंत ऊस आणि कांदा पिकाला विम्याचा लाभ देण्यात आला नाही. जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक एस. आर. पाटील यांनी सांगितले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक कपाशीसाठी पीक विमा उतरविला आहे. नोंदणीची संपूर्ण यादी तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत १६ कोटी ६१ लाख रूपयांचा विमा उतरविला आहे.सर्वच शाखांमध्ये विमा नोंदविण्याचे काम सुरू होते. एकाही शेतकऱ्याला पीक विमा उतरवितांना त्रास झाला नाही. ही समाधानाची बाब आहे.शासन व विमा कंपनीकडे वेळेत प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. त्यामुळे विमा उतरविल्यानंतर त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होईल. यंदाच्या वर्षी पावसाने दगाफटका दिल्याने शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला सोळा कोटींचा पीक विमा
By admin | Updated: September 1, 2014 01:06 IST