परभणी: येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना विभागात लिपिकाचे पद रिक्त असल्याने जवळपास ८ हजार लाभार्थी अनुदानापासून वंचित राहत आहेत.शहरातील संजय गांधी, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन व श्रावण बाळ योजनेचे अर्ज मंजूर करण्यासाठी २००९ पासून एकही बैठक झाली नाही. त्यामुळे पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित राहत आहेत. या प्रश्नी झोपडपट्टी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर लंगोटे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. योजनेची बैठक घेऊन अर्ज निकाली काढण्याची मागणी त्यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत तहसीलदार संतोष रुईकर यांनी सांगितले, संगायो शहर विभागातील लिपिक, अव्वल कारकून व नायब तहसीलदार ही पदे रिक्त होती. परंतु, २०१४ पासून ही पदे भरली आहेत. परंतु, या विभागातील आणखी एक लिपिकाचे पद रिक्त असल्याने निराधार योजनेची बैठक होत नाही. परिणामी परभणी शहरातील ८ हजार लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लंगोटे यांनी केली. (प्रतिनिधी)
आठ हजार लाभार्थी अनुदानापासून वंचित
By admin | Updated: September 19, 2014 00:07 IST