लातूर : महात्मा बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाहाला चालना दिली होती़ या आंतरजातीय विवाहामुळे जातीपातीच्या भिंती आपोआप गळून पडतात़ त्यामुळे आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात झाल्यास जाती निर्मूलन होईल, असे मत खा़ रामदास आठवले यांनी रविवारी येथे व्यक्त केले़भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित जाती निर्मूलन परिषदेचे उद्घाटक म्हणून खा़ रामदास आठवले बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा़ हर्षवर्धन कोल्हापूरे होते़ मंचावर प्रा़ सुनिल खोब्रागडे, व्हीएस पँथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके, सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष संजय सोनकांबळे, डॉ़ अजय ओव्हळ, पप्पू कागदे, ब्रम्हानंद चव्हाण, बाबासाहेब कांबळे, बाबा गायकवाड आदींची उपस्थिती होती़यावेळी खा़ आठवले म्हणाले बाबासाहेबांनी जातीयता नष्ट करण्यासाठी विविध स्तरावर लढे दिले असून, बहिष्कृत हितकारणी सभा, सर्वधर्मीय कामगारांचे संघटन व संविधान निर्मिती करून जातीयता घालविण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही जातीयता आहे. ही जातीयता घालविण्यासाठी बाबासाहेबांचा विचार घरा-घरांत पोहोचविण्याची गरज आहे. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. शासनाने यासाठी योगदान देण्याची गरज आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्या जिल्ह्यात जास्त आंतरजातीय विवाह होतील, त्या जिल्ह्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पाहिजे. शिवाय, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एकाला शासकीय सेवेत घेऊन जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शासनाकडे आम्ही मागणी केली असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला ५ लाखांची मदत करावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे खा. आठवले यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे यांनी केला.
आंतरजातीय विवाहामुळे जाती निर्मूलन शक्य
By admin | Updated: April 20, 2015 00:32 IST