गजेंद्र देशमुख , जालनागत काही वर्षांपासून जालना शहरातील नाट्य चळवळ थंडावली असून, विविध माध्यमांमुळे होत असलेली करमणूक व दर्जेदार नाट्य संचांनी पाठ फिरविल्याने ही चळवळ थंडवण्यासोबतच प्रेक्षकांतूनही नाटकाची गोडी कमी होत असल्याचा सूर वाचकांतून निघाला. जालना शहरातील नाट्य चळवळ थंडावली का? या विषयावर लोकमतने प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. जालना शहरात नाट्य चळवळीस चांगला इतिहास आहे. नाट्यांकूरसह अनेक संस्था एक पात्री तसेच बहुपात्रांच्या माध्यमातून शहरवासियांची नाटकांची भूक भागवत आहे. काही छोट्या मोठ्या संस्थाही नाट्य चळवळ जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. घनसावंगी तालुक्यातील डॉ. राजकुमार तांगडे यांनी लिहिलेल्या नाटकाने राज्यात शबासकी मिळविली. कैलास वाघमारे, वैशाली दाभाडेसह विविध उदयोन्मुख कलाकारांनी नाटकांच्या माध्यमातून चित्रपटाचे व्यासपीठ मिळविले. परंतु गत काही वर्षांपासून जालनेकरांसोबतच फुलंब्रीकर व आंबेडकर सभागृहानांही दर्जेदार नाटकांची प्रतीक्षा आहे. नाट्य चळवळीबाबत वाचकांची मते जाणून घेण्यासाठी एक विशेष सर्वेक्षण करण्यात आले. यात पाच पर्यायी प्रश्न विचारून उत्तरे घेण्यात आली. जालना शहरातील सांस्कृतिक व नाट्य चळवळ थंडावली का? यावर ६५ टक्के वाचकांनी होय असे उत्तर दिले तर २० टक्के चळवळ थंडावली नसल्याचे म्हणतात. १५ टक्के वाचकांनी माहिती नाही असे सांगितले. चित्रपट व मल्टीप्लेक्समुळे काहीअंशी फरक पडल्याचे ६० टक्के वाचक सांगतात. नवीन कलाकारांची कोंडी होत असल्याचे ६० टक्के वाचक सांगतात. दरम्यान, नाट्यचळवळ जीवंत ठेवण्यासाठी कार्यरत संस्थांनी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन जालन्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे, असा सूरही निघाला.
जालन्यातील नाट्यचळवळ थंडावलेलीच
By admin | Updated: August 26, 2015 00:46 IST