व्यंकटेश वैष्णव , बीडमागील आठ दिवसांत जिल्हयात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्हयातील २६० टँकर, १६३ विहिरी तर ३४३ अधिग्रहीत बोअर प्रशासनाने बंद केले आहेत़ यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसाला दहा लाख ३२ हजार ५०० रूपयांचा शासनाचा खर्च बंद झाला असल्याचे पाणी पुरवठा विभागातील सुत्रांनी सांगितले़एक एप्रिल पासून बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता़ जून महिन्यापासून टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली़ आॅगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात टँकरची संख्या २६० वर गेली होती़ यामध्ये २११ गावे तर ३११ वाड्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती़ यात बीड, गेवराई, शिरूर कासार, पाटोदा, आष्टी, केज, धारूर आदी तालुक्यांचा समावेश होता़ एप्रिल महिन्यापासून शासन टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करत होते़ मागील आठ दिवसांत जिल्ह्यात२१़९३ मि़ मी़ पाऊस झाल्यामुळे टंचाई काळात बंद पडलेले पाण्याचे उदभव सुरू झाले आहेत. वाड्या, वस्त्यावरील हातपंप सुरू होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़ मागील पाच महिन्यांत पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला आहे. एका टँकरला दिवसाकाठी तीन हजार रूपयाच्या जवळपास भाडे द्यावे लागायचे तर अधिग्रहीत केलेल्या बोअर व विहीरींना दिवसाकाठी पाचशे रूपये भाडे द्यावे लागत होते. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी सांगितले की, जिल्हयात समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याची समस्या संपल्याने टँकर बंद केलेले आहेत.दहा दिवसांच्या पावसामुळे नदी, ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न जवळपास मिटला आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. खरीप हंगामासाठी शेतकरी पुढील तयारी करतील यात शंका नाही. मात्र सध्याचा पाऊस आणखी झाला तर ओला दुष्काळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा टँकरमुक्त
By admin | Updated: September 3, 2014 01:11 IST