पाटोदा: तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यासह तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी यांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे सामान्यांची कामे वेळच्यावेळी होत नाहीत. त्यामुळे त्यांना शासकीय कार्यालयात वारंवार खेडे घालावे लागतात. रिक्त भरण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील तहसील कार्यालय म्हणजे विविध शासकीय कामांचे माहेरघर म्हटले तर वावगे ठरणार नाही. ग्रामस्थांना कोणतेही शासकीय कागदपत्रे काढायची असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय महसूल कार्यालय असो अथवा मंत्रालय येथे काम असेल तर त्याची सुरूवात तहसीलपासूनच होते. यासह शेतकऱ्यांची कामे, शैक्षणिक कामे, सामाजिक कामे आदींसाठी ग्रामस्थांना तहसीलमध्येच यावे लागते. तसेच शासनाच्या वतीने समाजोपयोगी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना तहसीलमधूनच राबविल्या जातात. असे महत्वाचे कार्यालय तहसील असले तरी येथील लिपिक, नायब तहसीलदार अशा महत्त्वाच्या जागा अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने सामान्यांची कामे खोळंबत आहेत. पाटोदा तहसीलमध्ये कारकुनाच्या दहा पदांना मंजुरी आहेत. यातील तीन पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. तर तीन कारकुनांच्या बदल्या झालेल्या आहेत. तहसीलमधील पुरवठा, आस्थापना, जमावबंदी, पाणीटंचाई अशा महत्त्वाच्या विभागातील कारकुनाच्या जागा रिक्त असल्याने सामान्यांची कामे होत नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे येथील पुरवठा विभागातील नायब तहसीलदारांचे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. याचा प्रभार इतरांकडे दिला असला तरी अशा महत्वाच्या ठिकाणचे पद रिक्त असल्याने याचा धान्य वितरणावरही परिणाम झालेला दिसून येत आहे.गांभिर्याची बाब म्हणजे महसूल राज्यमंत्रीपद याच विधानसभा मतदारसंघाच्या सदस्याकडे आहे. असे असतानाही अनेक पदे रिक्त असल्याने सामान्यांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तालुक्यात तलाठ्यांच्या २२ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील तब्बल आठ जागा अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे वेळेवर होत नाहीत. अनेकदा शेतकऱ्यांना त्यांच्या कामासाठी तलाठी आहे त्या ठिकाणी जावे लागते. एवढेच नव्हे, तर अंमळनेर व पाटोदा येथील मंडळ अधिकाऱ्यांचे पदही रिक्त आहेत.अशी महत्वाची पदे रिक्त असल्याने सामान्यांची कामे होत नाहीत. यामुळे या जागा भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख, कॉ. महादेव नागरगोजे यांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार दिनेश झांपले म्हणाले, रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. (वार्ताहर)रिक्त जागा भरण्याची मागणीतहसीलमधील पुरवठा विभागातील नायब तहसीलदारांचे पद रिक्त असल्याने धान्य वितरणावर झाला परिणाम.तहसीलमधील पाणीपुरवठा, आस्थापना, जमाबंदी अशा विविध विभागातील कारकूनांच्या जागा रिक्त असल्याने सामान्यांना कामासाठी मारावे लागतात खेटे.तालुक्यातील आठ तलाठ्यांसह दोन मंडळ अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या कामाचा खोळंबा.तालुक्यातील रिक्त जागा तात्काळ भरण्याची मागणी.
रिक्त जागांमुळे कामांचा खोळंबा
By admin | Updated: June 10, 2014 00:33 IST