सिरसाळा: मागील पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित केल्यामुळे व एरवीही कधीच सुरळीत वीज मिळत नसल्याने जयगाव व वांगी येथील ग्रामस्थांनी महावितरणच्या ३३ के.व्ही. कार्यालयाची गुरुवारी तोडफोड केली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सिरसाळा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरून जयगाव, वांगी या गावांसह परिसरातील इतर गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र मागील आठवडाभरापासून व्यवस्थित वीजपुरवठा होत नसल्याने व पाच दिवसांपासून कायमचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे जयगाव, वांगी येथील चिडलेल्या ग्रामस्थांनी सिरसाळ्याच्या ३३ के.व्ही. कार्यालयाची तोडफोड केली. हा वीजपुरवठा खंडित करण्यामागे क्षुल्लक कारण असल्याचे येथे सांगितले जात होते. वीजपुरवठ्यासंदर्भात येथील अधिकारी, कर्मचार्यांना वेळोवेळी कळवूनही ही समस्या सुटली नसल्याने ही तोडफोड करण्यात आली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी वांगी येथील दत्तात्रय भिसे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोडफोड केल्यामुळे पंधरा हजारांचे नुकसान झाले असून दोन तास परिसरात वीजपुरवठा खंडित होता. (वार्ताहर)
महावितरणच्या कार्यालयात तोडफोड
By admin | Updated: May 18, 2014 00:46 IST