कळंब : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत जवळपास चार हजार मजुरांची नोंदणी असलेल्या डिकसळ येथे मजुरांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुनिष्ठ माहिती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, यासाठी गुरुवारी दुपारपासून जवळपास बारा कर्मचाऱ्यांचे पथक डिकसळ येथे ठाण मांडून असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी दुपारी डिकसळ येथे अचानक भेट दिली होती. यावेळी त्यांनी मग्रारोहयोअंतर्गत चालू असलेल्या हनुमान मंदिर ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था या कामावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी कामावर अपेक्षित मजूर संख्या नव्हती. तसेच गावात जवळपास चार हजारावर नोंदणीकृत मजूर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावर तालुका प्रशासनाला प्रत्यक्ष मजुराची भेट घेऊन विविध मुद्यांवर त्यांचा जाब घेऊन दोन दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. यानुसार कळंब पंचायत समितीतील तांत्रिक अधिकारी सुधीर बंडगर, एस. के. पवार, राहुल पोतदार, राकेश सगर, डी. पी. पवार, जे. एस. उस्मानी तसेच तलाठी एरंडे, तहसीलमधील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सोळंके, उदगिरे यांच्यासह अन्य काही कर्मचाऱ्यांचे पथक गुरुवारी दुपारपासून डिकसळ येथे ठाण मांडून असल्याचे समजते. हे पथक नोंदणीकृत मजुरांची प्रत्यक्ष भेट घेऊन तो मजूर गावचा रहिवासी आहे का, त्याचे स्थलांतर झाले आहे का, या मजुरांना इतरत्र मजुरी उपलब्ध आहे का, मग्रारोहयोचे काम सुरू झाल्यास काम करण्याची तयारी आहे का, आदी मुद्यांवर जबाब घेतले जात आहेत. यावरुन प्रत्यक्ष कामावर जाण्याची गरज असलेल्या मजुरांना फायदा होणार असून, पांढरपेशा मजुरांचे जॉबकार्ड रद्द होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. गुरूवारी रात्री आठ वाजेपर्यंत हे पथक मजुरांचे घरे शोधत फिरत होते. (वार्ताहर)
डिकसळमध्ये बारा कर्मचाऱ्यांचे पथक !
By admin | Updated: June 19, 2014 23:53 IST