खुलताबाद : तालुक्यातील जनतेसाठी औरंगाबाद शहराला जोडणाऱ्या काटशेवरी ते जटवाडा रस्त्याचे काम ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांना या खडतर रस्त्यावरून प्रवास करावा लागत असून, तो त्रासदायक ठरत आहे. औरंगाबाद शहराला जोडणारा महामार्ग रखडल्याने खुलताबाद तालुक्याचा विकासाचा मार्ग रखडल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे.
खुलताबाद तालुक्यातील शेतकरी, कर्मचारी यांना सोयीचा असलेला आणि खुलताबाद तालुक्यातील बहुतांशी गावांना शहराशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे काटशिवरी-जटवाडा-औरंगाबाद रस्ता होय. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी अनेक वेळा रस्ता रोको, धरणे आंदोलन केले होते. परिणामी महाराष्ट्र शासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून काम चालू असून डांबरीकरणाचे काम अर्धवट झालेले आहे. रस्त्यातील अनेक ठिकाणी पुलाचे काम आणि डांबरीकरण करणे बाकी आहे. तसेच गोळेगाव ते काटशिवरी हा दोन किलोमीटर रस्ता केवळ मातीचा भराव घालून अर्धवट सोडण्यात आला आहे, तर ओहर गावापासून शहरापर्यंत रस्त्यात जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय वाढली आहे. या रस्त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा असल्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी, औरंगाबाद शहरात येण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. परंतु रस्ता खराब असल्याने रात्री-अपरात्री नागरिकांची, शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रस्त्यांचे उर्वरित काम त्वरित करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी हे गंगापूर तालुक्यातील असल्याने त्यांचेे खुलताबाद तालुक्यातील विकासकामांकडे सतत दुर्लक्ष होत असते. खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद- म्हैसमाळ, काटशिवरीफाटा ते जटवाडा, खुलताबाद ते फुलंब्री या मार्गाचे काम जाणूनबुजून पूर्ण केले जात नाही. धामणगाव -लोणी -बोडखा , खुलताबाद- खिर्डी, वेरूळ, दावल ते धुळे राष्ट्रीय महामार्ग यासह अनेक रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. या रस्त्यांच्या कामांना सुरू होऊन दोन ते तीन वर्षे होत आहेत. तालुक्यातील जनता खराब रस्त्यांमुळे जिवंतपणी मरणयातना भोगत आहे.