महाराष्ट्राचे मंत्री तथा स्वातंत्र्यसेनानी कै. बाबूरावजी ऊर्फ अप्पासाहेब काळे यांचे द्वितीय पुत्र रंगनाथ काळे हे १९९० पासून सक्रिय राजकरणात आले. १९९६ च्या जि.प. निवडणुकीत सोयगाव जि.प. गटामधून विजयी होत पुढे ते जि.प.चे अध्यक्ष झाले. यादरम्यान त्यांनी अनेक विकासाभिमुख कार्य करीत तापी खोऱ्याचे मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा करून ही मागणी पूर्ण केली. भराडी, घाटनांद्रा, तिडका, पाचोरा या राज्यमार्गाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यरत राहून सोयगाव- फर्दापूर- मोहलाई- नाइलाई रस्त्यांच्या कामासह इतर कामांसाठी पाठपुरावा केला.
त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील प्रयत्नाने जि.प.ला जमीन मिळू शकली. सिल्लोडमधील मध्यम प्रकल्पांची मंजुरी मिळविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सोयगाव तालुक्यातील साठवण तलावांच्या पाणी उपलब्धतेसाठी त्यांनी शासनाकडे विशेष प्रयत्न केले. गंगापूर तालुक्यातील टेंभापूर प्रकल्प, मंत्री बाळासाहेब थोरात व तत्कालीन आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण करण्यात यश आले. १९९९ मध्ये काँग्रेसने सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली; परंतु पक्षातील बंडखोरीमुळे त्यांना पराभव पत्कारावा लागला. तरीही त्यांनी जनसेवेची नाळ तुटू न देता, राजकीय संबंधांचा वापर करीत सोयगावात १३२ के.व्ही.चे सबस्टेशन, तसेच जरंडी, किन्ही, सावळदबारा येथे ३२ के.व्ही.चे विद्युत केंद्र मंजूर करून घेतले. खा. शरद पवार यांच्या निमंत्रणानंतर त्यांनी २००७ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून गरजू गरीब शेतकऱ्यांना कर्ज वाटप, तसेच अजिंठा शिक्षण संस्थेमार्फत कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्यविकासासारखे कोर्स सुरू केले. पूर्व प्राथमिक शाळा ते महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधांसह अजिंठ्यात कै. बाबूरावजी काळे कला महाविद्यालय सुरू करीत औरंगाबादेत पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाची इमारत उभारली. यासह औरंगाबाद, जळगाव, बुलडाणा, जालना जिल्ह्यांतील नागरिक औरंगाबादेतील विविध दवाखान्यांत आल्यानंतर नाना त्यांना हक्काने मदत करतात. सर्वांशी आपुलकी व प्रेमाने बोलणारे नानासाहेब मराठवाड्यातील गोरगरीब जनतेला आपला आधार वाटतात. व्यक्तिगत आयुष्यात तत्त्वनिष्ठ निष्कलंक व्यक्तिमत्त्वाला उदंड आयुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
-प्रा. शिवाजी शिरसाठ, प्रा. भास्कर टेकाळे