औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) तीन हजार वाहन नोंदणी प्रमाणपत्रांचा (आरसी) ‘डाटा डिलिट’ झाला आहे. गेल्या महिनाभरापासून कार्यालयात डिलिट झालेली माहिती नोंदविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना वेळेत आरसी मिळत नसल्याचे दिसत आहे. आरसी मिळविण्यासाठी चकरा मारण्याची वेळ येत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.आरटीओ कार्यालयात कागदी स्वरूपातील आरसी बुकऐवजी स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात करण्यात आली होती. यासाठी स्मार्ट कार्डच्या वितरणाचे कंत्राट देण्यात आले होते; परंतु वाहन खरेदीनंतर स्मार्ट कार्डमधून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) तयार करणाऱ्या कंपनीचा आरटीओ कार्यालयाशी असलेला करार संपला. त्यामुळे नवीन करार होईपर्यंत १ डिसेंबरपासून जुन्या पद्धतीनुसार कागदी आरसी देण्यासाठी कामकाज सुरू करण्यात आले. हे कामकाज सुरू करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये कार्यालयात सॉफ्टवेअर सुधारीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. या कामामुळे लर्निंग आणि पर्मनंट लायसेन्स वगळता अन्य कामे बंद ठेवण्यात आली होती. परंतु याच दरम्यान जवळपास ३ हजार वाहनधारकांची माहिती ‘डिलिट’ झाली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून हजारो वाहनधारक ‘आरसी’च्या प्रतीक्षेत आहेत. आरसी कधी मिळणार याची विचारणा करण्यासाठी वाहनधारक वारंवार आरटीओ कार्यालयात चकरा मारीत आहेत.
३ हजार वाहनांचा डाटा डिलिट
By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST