आशपाक पठाण , लातूरलातूर महापालिकेने सुरू केलेली परिवहन सेवा कोलमडली असून केवळ एकाच मार्गावर वाहतूक सुरू आहे़ अत्यंत थाटामाटात सुरू झालेली ही सेवा कमी बसेसमुळे प्रवाशांच्या सोयीऐवजी आता गैरसोयीची ठरत आहे़ गंजगोलाई ते बार्शी रोड याच मार्गावर सिटी बस सुरू आहे़ इतर मार्गावरील बस गेल्या महिनाभरापासून बंद झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे़केंद्र शासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत लातूर महापालिकेला बसेस मंजूर झाल्या़ केंद्राकडून निधी प्राप्त होण्याअगोदरच महापालिकेने स्वत: तीन बसेस खरेदी केल्या़ लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून परिवहन सेवेला प्रारंभ झाला़ संपूर्ण शहरात बसेस धावणार असल्याने मनपाने नियोजनही केले़ मात्र, केंद्र शासनाने जेएनएनयुआरम योजनेलाच पूर्णविराम दिल्याने लातूरच्या परिवहन सेवेला ग्रहण लागले़ केंद्र शासनाकडून निधी मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्यावर परिवहन विभागाने महापालिकेकडूनच सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार नवीन ८ बसेस खरेदी करण्याचा निर्णयही झाला़ परंतू अद्याप बसेसची खरेदीच झाली नसल्याने शहराच्या एकाच मार्गावर परिवहन सेवा सुरू असल्याने इतर मार्गावरील प्रवाशांना मात्र खाजगी आॅटोरिक्षांशिवाय पर्याय नाही़ गंजगोलाई ते राजीव गांधी चौक, १२ नं़ पाटी, अंबाजोगाई रोडवरील मेडिकल कॉलेज, नांदेड रोडवरील कोळप्यापर्यंत सिटी बस सेवा सुरू झाली़ कमी दरात प्रवाशांना सेवा मिळत असल्याने प्रारंभी प्रतिसादही चांगला मिळाला, मात्र, बस येण्याची वेळच नक्की नसल्याने प्रतिसाद कमी होत गेला़ दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे करून एकाच मार्गावर तीन बसेस धावत आहेत़ (प्रतिनिधी)
सिटी बसची सेवा कोलमडली !
By admin | Updated: January 4, 2016 00:05 IST