---
गेल्या दहा वर्षांपासून नळाची जोडणी मिळालेली नसल्याने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. यापूर्वीही पाणी पुरवठा योजनेचे २०१४ मध्ये उद्घाटन झाले तेव्हा पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. त्याला सहा वर्ष सरले, आता पुन्हा नव्या योजनेचे भूमिपूजन झाले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे प्रत्यक्ष दहा रुपयांत हजार लिटर पाणी मिळेल तेव्हाच खरे म्हणावे लागेल.
-प्रशांत वडगांवकर, नोकरदार, तारांगण, पडेगांव
--
सातारा परिसरात नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे पुरेसे पाणी मिळेल असे वाटते. योजना पूर्ण होईपर्यंतची पर्यायी व्यवस्थाही मुख्यमंत्र्यांनी करायला हवी होती. सध्या साताऱ्यात पाणी आणि ड्रेनेजची सुविधा नसल्याने समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात मनपाकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे रोजचे कुटुंबाचे दिनक्रम अवघड बनले आहे.
-स्नेहल डिक्कर, गृहिणी, सातारा परिसर
---
समांतर, घोषणा, भूमिपूजन हे शब्द ऐकून आता म्हातारपण आले. अनेक वर्षांपासून शहरवासीयांना मूर्ख बनवण्याचे धंदे सर्वच सत्ताधारी करताना पाहिले. हे भूमिपूजनही फसवे ठरु नये एवढी अपेक्षा आहे. आम्हाला पाणी नाही मिळाले, किमान आमच्या मुलाबाळांना तरी पाणी द्यावे. श्रेयवादात पुन्हा नवी पाणीपुरवठा योजना अडकू नये एवढीच मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे.
-श्रीकांत बोरुडे, व्यावसायिक, चिकलठाणा