कचनेर : श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, कचनेर येथे मंगळवारी भाद्रपद पौर्णिमा उत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त भगवंतांचा पंचामृत महाभिषेक करण्यात आला. हा सोहळा डोळ्यात साठवून घेण्यासाठी देशभरातून आलेल्या असंख्य भाविकांनी गर्दी केलीे होती. गेल्या दहा दिवसांपासून मंदिरात पर्युषण पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. त्या पर्वाचीही क्षमावलीने आज सांगता झाली. तसेच पौर्णिमेनिमित्त महाभिषेक सोहळा पार पडला. इंद्र-इंद्रायणीच्या बोलीचा मान शशिकांत अभयकुमार पंचवाटकर (अंबड), सर्व औषधी-अनमोल चंद्रकुमार कासलीवाल (आडूळ), चंदनलेपन व पुष्पवृष्टी-कपिल, अनुराग जैन परिवार (इंदोर), तीर्थरक्षा कलश-भरतकुमार मदनलाल ठोळे (कसाबखेडा), शांतीमंत्राची बोली अशोककुमार, किशोरकुमार, दीपचंद लोहाडे (जामनेर) यांना मिळाला. अतिशय क्षेत्रातर्फे भंडारदाते हिराबाई वसंतराव सोनटक्के (बिडकीन) व बोली घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बोलीसम्राट अशोक अजमेरा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी क्षेत्राचे महामंत्री भरत ठोळे, अशोक गंगवाल, चिंतामण काळे (अंबड), मनोज साहूजी, प्राचार्य किरण मास्ट, पुजारी रामदास जैन, मंदिराचे व्यवस्थापक स्वप्नील जैन, नितीन जैन आदींसह क्षेत्राचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. बिडकीननिवासी हिराबाई वसंतराव सोनटक्के यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला. (वार्ताहर)
महाभिषेक सोहळ्याने भाद्रपद पौर्णिमा साजरी
By admin | Updated: September 10, 2014 00:51 IST