आशपाक पठाण ; लातूरराज्य शासनाने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहिर केल्यामुळे तहसीलच्या सेतू सुविधा केंद्रात जात प्रमाणपत्र काढण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून गर्दी आहे़ प्रारंभी लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या तारखेनुसार प्रमाणपत्र देण्यात आले़ मात्र गेल्या आठ दिवसांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसाठी गेलेल्या संचिका स्वाक्षरीविना पडून असल्याने सेतू-सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही लाभार्थ्यांचे बोलणे घ्यावे लागत आहे़ अधिकारी कामात व्यस्त असल्याने फायली दुर्लक्षित झाल्या असून तहसीलमधून गेलेल्या संचिका उपविभागीय कार्यालयात ठेवूनही घेतल्या जात नसल्याची चर्चा आहे़लातूर येथील सेतू-सुविधा केंद्रात विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी नेहमीच गर्दी असते़ शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यावर जवळपास ३ महिने भल्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात़ उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलीअर, रेशनकार्ड आदी कामांसाठी नागरिकांना सेतू-सुविधा केंद्राचा आधार घ्यावा लागतो़ प्रवेशाचे वेळ असल्याने अधिकारी-कर्मचारीही तत्परतेने प्रमाणपत्र वितरीत करण्याचा प्रयत्न करतात़ मात्र, गेल्या आठ दिवसांपासून जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याची ओरड वाढली आहे़ सेतू सुविधा केंद्रात नागरिकांना खेटे घालावे लागत आहे़ शपथपत्र तयार करून अर्ज दाखल केल्यावर ३ ते ७ दिवसांचा कालावधी दिला जातो़ प्रशासनाने दिलेला कालावधी पूर्ण होऊन आठ दिवस लोटले तरी ‘साहेबांची स्वाक्षरी’ राहिल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे़ ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना मात्र रिकाम्या हाताने परतावे लागत आहे़ सेतू केंद्रात शपथपत्र तयार झाल्यावर प्रमाणपत्राच्याअपेक्षेने येणाऱ्या लाभार्थ्यांची निराशा होत आहे़ मोठ्या टेबलावर स्वाक्षरीविना फायली आडल्याने नागरिकांची गैरसोय वाढत आहे़ मंगळवारी तहसील कार्यालयात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावेत, अशी मागणी केली़ जात प्रमाणपत्रासाठी सेतू-सुविधा केंद्रात आलेल्या संचिका तपासून शपथपत्र करून घेतले जाते़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी संकिर्ण विभागात जातात़ कार्यालयीन कार्यवाही पूर्ण झाल्यावर स्वाक्षरीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविल्या जातात़ परंतू आपल्याकडून स्वाक्षरी होऊन पाठविण्यात आलेल्या संचिका उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी ठेवून घेत नाहीत़ त्यामुळे सदरील संचिका संकिर्ण विभागात पडून आहेत़ जात प्रमाणपत्राचे अधिक प्रस्ताव असल्याने लाभार्थ्यांकडून आम्हाला त्रास होत असल्याची तक्रार तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याने तहसीलदार महेश शेवाळे यांच्याकडे केली आहे़ उपविभागीय कार्यालयात आलेल्या संचिका २४ तासाच्या आत स्वाक्षरी करून तहसीलकडे पाठविण्यात येतात़ दररोज ४०० ते ५०० संचिका येतात़ गेल्या आठ दिवसांत १ हजार ९७७ प्रमाणपत्र दिले़ मंगळवारी सकाळी माझ्याकडे ७०० संचिका आल्या आहेत़ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४६५ संचिकावर स्वाक्षरी केली़ त्यात २५ आॅगस्टपासूनच्या संचिका आहेत़ भूसंपादन, विविध बैठका आता निवडणुकीची कामे लागली आहेत, एवढ्यातूनही कामे पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असतो़ जाणीवपूर्वक संचिका अडविल्याची चर्चा केली जात असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रताप काळे यांनी सांगितले़आरक्षण जाहिर झाल्यापासून तहसीलच्या सेतू-सुविधा केंद्रात दररोज २५० ते ३०० प्रकरणे दाखल होत होती़ त्यावेळी आलेला प्रत्येक प्रस्ताव वेळेत कसा जाईल, याची काळजी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून घेतली गेली आहे़ शाळा-महाविद्यालयाची प्रवेश बंद आहेत़ त्यामुळे एक दोन दिवस मागेपुढे होत असतील़ उपविभागीय कार्यालयात फायलींवर आता सह्या सुरू झाल्या आहेत़ लाभार्थ्यांची गैरसोय करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, गेल्या तीन महिन्यात २३ हजार प्रमाणपत्र वाटप केल्याचे तहसीलदार महेश शेवाळे यांनी सांगितले़
जात प्रमाणपत्र अड(वि)ले !
By admin | Updated: September 3, 2014 01:10 IST