कायगाव : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील २०१ आरोग्य उपकेंद्रात समुदाय वैद्यकीय अधिकारी नेमण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला असून सोमवारी(१४ डिसेंबर) होणारी ही प्रक्रिया आता पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत शनिवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेतलेल्या अंतिम परीक्षेत जिल्ह्यातील २०१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानकडून तात्काळ नियुक्ती प्रक्रिया राबवून १० डिसेंबरपर्यंत नव्या आरोग्य अधिकाऱ्यांना उपकेंद्रांवर रुजू करण्याचे आदेश सीईओंना देण्यात आले होते. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, फुलंब्री, आणि औरंगाबाद या ९ तालुक्यातील २३९ पैकी २०१ उपकेंद्रात यांची नियुक्ती करण्यात येणार होती. १४ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात जिल्हा परिषदेकडून उपकेंद्रांवर नियुक्ती देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच ११ डिसेंबरपासून
एप्रिल २० ते डिसेंबर २० दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अचारसंहिता लागू झाल्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
चौकट
१६ डिसेंबरपर्यंत चालणार होती प्रक्रिया
सध्या कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णांना उपकेंद्रपातळीवरच चांगली आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने नव्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना १० डिसेंबरपर्यंत उपकेंद्रांवर रुजू करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानकडून देण्यात आले होते. छानणी, पडताळणी आणि इतर नियुक्ती प्रक्रियेला वेळ लागल्याने औरंगाबाद जिल्ह्यात १६ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार होती. मात्र त्यातही आता आचारसंहितेचा खोडा बसल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरच समुपदेशन प्रक्रिया राबविली जाणार आहे.