उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील कळंब - येरमाळा मार्गावरील हसेगाव नजीक बुधवारी रात्री टमटम व ट्रॅक्टरची धडक होवून झालेल्या अपघातात झारखंड राज्यातील दोन युवकाचा जागीच मृत्यू झाला़ युवकांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच झारखंडमधील भाजपाच्या नेत्यांनी त्यांचे पार्थिव गावी नेण्यासाठी दिल्ली-मुंबई पासून हलचाली सुरू केल्या आहेत़ रुग्णालयीन सूत्रांक़डून मिळालेली माहिती अशी की, झारखंड राज्यातील रांची शहरानजीकच्या गावातील राजकुमार पालगुप्ता (वय-२८) व मुनुचंद पृयाग सहा (वय-३० दोघे झारखंड ह़मुक़ळंब) हे युवक उस्मानाबाद येथील संजय देशमुख यांच्या जेसीबीवर काम करत होते़ सदरील दोघेही युवक बुधवारी सायंकाळी येरमाळा- कळंब मार्गावरून टमटममधून प्रवास करीत असताना हासेगाव नजीक टमटमची ट्रॅक्टरशी धडक झाली़ या अपघातात टमटममधील दोघे युवक गंभीर जखमी झाले़ त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते़ मात्र, त्यांना तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़ मयत युवकांच्या झारखंडमधील नातेवाईकांना त्यांच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच तेथील भाजपाच्या खासदारामार्फत केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या कार्यालयात संपर्क साधण्यात आला़ तेथून मुंबईतील मंत्रालयात फोन करण्यात आला़ भाजपाचे राज्याचे प्रभारी नेते ओम माथूर यांच्या कार्यालयातील जोधन कुमार यांच्यासह मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली़ काळे यांच्यासह जेसीबीचे मालक संजय देशमुख यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली. पार्थिवाचे शवविच्छेन करून ते जिल्हा रूग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले होते़ मयत युवकाचे काही नातेवाईक भाजपाचे कार्यकर्ते आहेत़ त्यामुळे मयतांचे पार्थिव गावाकडे न्यावे आणि विधीवत अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी मुंबईतून काहींना उस्मानाबादकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पार्थिव उस्मानाबाद येथून रांचीकडे नेण्यासाठी खासगी शववाहिकेची सोय करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत पार्थिव नेण्याबाबतच्या हलचाली सुरू होत्या़ भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनीही मयतांचे पार्थिव मुंबईकडे पाठवून देण्यासाठी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
टमटम-ट्रकच्या धडकेत दोघे ठार
By admin | Updated: February 13, 2015 00:47 IST