संजय तिपाले ,बीडजिल्ह्यात सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करुन उभारलेले कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक आहेत. निम्म्या बंधाऱ्यांना दरवाजे नाहीत तर काही बंधाऱ्यांच्या भिंतींना तडे गेले आहेत. एकीकडे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना दुसरीकडे मात्र, पावसाचे पाणी आले तसे वाहून गेले. बंधारे दुरुस्तीसाठी आता जि़प़ ने तब्बल ३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला आहे़ उल्लेखनीय हे की, हा प्रस्ताव मूळ खर्चाच्या दीडपट इतका आहे़१९९५ ते २००२ या दरम्यान जिल्ह्यात ३४७ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले़ बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता ८४४.१५ दक्षलक्षघनफूट इतकी आहे़ बंधाऱ्यांखालील ६ हजार ३६३ हेक्टर शेती सिंचनाखाली येणे अपेक्षित होते़ बंधाऱ्यांवर २१ कोटी ३ लाख ५३ हजार रुपये इतका खर्च झाला होता़ ३४७ पैकी १७४ बंधाऱ्यांना आता दरवाजेच राहीले नाहीत़ उर्वरित बंधाऱ्याचीही कमी-अधिक प्रमाणात दुरवस्था झाली आहे़ त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये पाणी साचून राहत नाही़ परिणामी बंधाऱ्यांखालील ६ हजाराहून अधिक हेक्टर शेती धोक्यात आली आहे़ सरत्या वर्षी जिल्ह्यात केवळ ५६ टक्के पाऊस झाला़ घटलेल्या पर्जन्यमानाने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे़ कोल्हापुरी बंधारे सुस्थितीत असते तर जानेवारीतच साठे कोरडेठाक पडले नसते;परंतु निम्म्या बंधाऱ्यांना दरवाजे नाहीत़ याची कोठे दाद ना फिर्याद अशी परिस्थिती आहे़दरम्यान, जिल्हा परिषदेच्या लघुपाटंबधारे विभागाने बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ३७ कोटी १० लक्ष ४६ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे़ यामध्ये नव्या दरवाजांसाठी ७ कोटी ८६ लाख ८६ हजार तर अनुषंगिक दुरुस्तीकरता २९ कोटी २३ लाख ६० हजार रुपये इतक्या खर्चाचा समावेश आहे़जिल्ह्यात सतत दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे़ या स्थितीला सामोरे जाताना जलसंधारणावर भर देणे आवश्यक आहे़ कोल्हापुरी बंधाऱ्यांना दरवाजे नसणे, रखडलेली दुरुस्ती यामुळे बंधाऱ्यात पाणी टिकत नाही़ त्यामुळे नवीन दरवाजे व इतर दुरुस्तीकामांसाठी ३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे़ सीईओंमार्फत हा प्रस्ताव शासनदरबारी ठेवल्याचे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी़ डी़ खंदारे यांनी सांगितले़ निधी येताच कामे करण्यात येतील, असेही ते म्हणाले़
बंधाऱ्यांमध्ये पाणी आले अन् वाहून गेले !
By admin | Updated: January 2, 2015 00:46 IST