जालना - शेजार्याशी झालेल्या क्षुल्लक वादातून विठ्ठलसिंग राजपूत यांना चौघांनी घरातून ओढत आणून तीक्ष्ण हत्यार, पाईप व काठीने मारहाण करून त्यांचा निर्घृण खून केला. ही घटना गुरूवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जुना जालन्यातील साळी गल्ली परिसरात घडली. नंतर मुख्य आरोपी स्वत:हून ठाण्यात हजर झाला. उर्वरित तिघांना पोलिसांनी अटक केली. राजपूत हे एका साप्ताहिकाचे पत्रकार होते. राजपूत हे घरात असताना चार जणांनी त्यांच्यावर शस्त्रास्त्रांनी हल्ला केला. मात्र सुरूवातीला या हल्ल्यातून बचाव करून राजपूत यांनी गल्लीतून पळ काढला. साळी गल्ली भागातील पथदिवे बंद असल्याने हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला नाही. जवळपास अर्धा कि़मी.अंतर पळून गेल्यानंतर मित्र कैलास सीताराम शिंदे यांच्या गवळी मोहल्ला भागातील घरात विठ्ठलसिंग राजपूत यांनी आश्रय घेतला. मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून शिंदे यांचे घर गाठले व ‘राजपूत यांना घराबाहेर पाठवा, नाही तर हल्ला करूत,’ अशी धमकी दिली. त्यावेळी राजपूत यांनी मागच्या दाराने पळ काढला. ते आरोपींनी पाहिले व जनता शाळेच्या जवळच राजपूत यांना पकडले. राजपूत यांनी प्रतिकार म्हणून सुनील सोनारला (१९) धक्का मारल्याने तो खाली पडला. त्यामुळे शेख अन्वर शेख बाबरने (२१) राजपूतवर चाकूने वार करण्यास सुरूवात केली. अन्य दोघे जण अकबरखान युसूफखान (२४) व नितीन मदन हेलगट (२०) यांनी पाईप, काठीने हल्ला केला. राजपूत यांना डोके, छाती, पोटावर खोलवर जखमा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाला. कदीम जालना पोलिसांना कैलास शिंदे यांनी दूरध्वनीवरून कळविल्याने पोलिस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार हे घटनास्थही पथकासह हजर झाले. जमादार पिंपळे यांनी नोंद घेतली.गुरूवारी रात्री उशिरा कदीम जालना पोलिस ठाण्यात आनंदीस्वामी गल्ली येथील कैलास सीताराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून सुनील रामेश्वर सोनार (साळी गल्ली), शेख अनवर शेख बाबर, अकबरखान युसूफखान (दु:खीनगर) व नितीन मदन हेलगट (शिशटेकडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी सुनील सोनार हा स्वत:हून ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना घटनेची कबुली दिली.
क्षुल्लक वादातून एकाचा खून
By admin | Updated: May 24, 2014 01:39 IST