गजेंद्र देशमुख ,जालनाआद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरी:येथे आयोजित सहाव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनानिमित्त शनिवारी सकाळी काढण्यात आलेली ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. लेखिकांनी वाहिलेली ग्रंथदिंडी व विद्यार्थ्यांनी साकारलेले सजीव देखावे, चिमुकल्या विद्यार्थिनींनी डोक्यावर घेतलेले तुळशीवृंदावन, वारकऱ्यांचा टाळ निनादाने दिंडीने जालनेकरांचे लक्ष वेधून घेतले. चमन परिसरात सकाळी आठ वाजल्यापासून अनेक शाळांची विद्यार्थी जमू लागले होते. साडेआठ वाजता संमेलनाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. छाया महाजन दाखल झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वीर सावरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच विविध संत महतांच्या, वारकऱ्यांच्या वेशभुषा करुन अनेक शाळांतील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने सरस्वती भुवन प्रशाला, नागोजीराव सतकार शाळा, जाफराबादकर विद्यालय, लोकमान्य विद्यालय, अंकुर बालक मंदिर, शिशुराज बालक मंदिर, प्रभावतीबाई कोळेश्वर प्राथमिक शाळा, संस्कार प्रबोधिनी सुरेखा बालक मंदिर, साहनी विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थी लेझिम पथकासह सहभागी झाले होते. सव्वा नऊ वाजता सीमाताई खोतकर यांच्यासह मान्यवरांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते ग्रंथ दिंडी मार्गस्थ झाली.
ग्रंथदिंडीने लक्ष वेधले !
By admin | Updated: January 18, 2015 00:28 IST