लातूर: लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिसऱ्या दिवशी ६२ अर्जांचा पाऊस पडला. एकूण अर्जांचा आकडा १०८ वर गेला असून उमेदवार मात्र फक्त ७४ आहेत. तयारीनिशी उतरणार अशी सिंहगर्जना करणाऱ्या भाजपाला शिरुर अनंतपाळ व रेणापूर वगळता सर्व मतदारसंघात उमेदवार मिळाले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते विक्रम गोजमगुंडे यांनी काँग्रेस प्रणित पॅनलच्या विरुध्द बंड करुन भाजप या मुख्य विरोधकांबरोबर हातमिळवणीचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्वत: अर्ज भरला असून आपण भाजपाबरोबर नाही तर स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवार हा शेवटचा वार होता. मागच्या दोन दिवसात ६७ अर्ज दाखल झाले होते. तिसऱ्या दिवशी ६२ अर्ज आले. परंतु अनेकांनी दोन - दोन, तीन - तीन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या ही ७४ आहे. काँग्रेसचे नेते विक्रम गोजमगुंडे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवी खेळी खेळली आहे. त्यांनी स्वत: मत्स, कुक्कूटपालन, मेंढपाळ, ग्राहक, औद्योगिक सह. सहकारी संस्था मतदारसंघातून अर्ज भरला आहे. त्यांना अच्युत कदम व सुमनबाई खंडागळे यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत. तर दिलीपराव देशमुखांच्या विरोधात अर्ज भरलेल्या भरत चामले यांना सूचक म्हणून विक्रम गोजमगुंडे यांनी सही केली आहे.रेणापूर वगळता भाजपाच्या ‘परिवर्तन’ पॅनलला सर्व ठिकाणी उमेदवार मिळाल्याची चिन्हे आहेत. त्यात भाजपाने एकट्याने न लढता काही ठिकाणी अन्य पक्षांचीही मदत घेतली आहे. त्यात अपक्ष आमदार विनायकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना कार्यकर्त्यांचीही मदत घेऊन मोट बांधून ‘परिवर्तना’ची हाक देण्याची तयारी सुरु केली आहे. यात त्यांना लातूर तालुक्यातून शरद शिंदे, औसा तालुक्यातून सेनेचे युवराज बिराजदार, निलंगा तालुक्यातून दगडू सोळंके किंवा प्रदीपकुमार पाटील, उदगीरमधून माजी आमदार गोविंद केंद्रे, देवणीमधून भगवानराव पाटील, जळकोटमधून धर्मपाल देवशेट्टे, शिरुरअनंतपाळमधून विजयकुमार पाटील, चाकूरमधून शिवाजीराव काळे किंवा प्रल्हाद सूर्यवंशी वा नागनाथ पाटील या तिघांपैकी एक, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून बाबु खंदाडे किंवा राकाँचे भरत चामले, महिला प्रतिनिधी मतदारसंघातून छाया पाटील, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी मतदारसंघातून राजकुमार भोसले, भटक्य विमुक्त प्रतिनिधी मतदारसंघातून अशोक केंद्रे, मत्स, कुक्कूटपालन, मेंढपाळ मतदारसंघातून सेनेचे बाळासाहेब डोंगरे वा बंडखोर विक्रम गोजमगुंडे, मजूरमधून दत्तु आल्टे किंवा राजकुमार भोसले, मार्केटींग, कृषी प्रक्रिया मतदारसंघातून राकाँचे भरत चामले, नागरी बँक मतदारसंघातून रमेश कराड असे उमेदवार ठरु शकतात. (प्रतिनिधी)लोकसभा-विधानसभा निवडणुकीत प्रभाव टाकणाऱ्या भाजपचा सहकाराच्या राजकारणात मात्र पुरता धुव्वा उडाला़ मांजरा, विकास, रेणा या तिन्हीही कारखान्यात देशमुख गट प्रभावी राहिला़ पर्यायाने सहकारात काँग्रेसने चांगलाच दबदबा निर्माण केला़ आता जिल्ह्यातील अर्थवाहिनी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेस तळापासून मजबूत असताना भाजपने पॅनलची तयारी केली आहे़ हे आव्हान भाजपला पेलवेल का? याची चर्चा लातूर जिल्ह्यात सुरू आहे़ माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची जबरदस्त पकड आहे़ ती मोडून काढणे अवघड आहे़ भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी पुर्ण ताकदीनिशी उतरण्याचे संकेत दिल्याने या निवडणुकीत तरी इतर सहकारी संस्थात डिपॉजिट न वाचविता आलेल्या विरोधकांना मते मिळतील का, हे आता काळच सांगेल़ रेणापूर तालुका मतदारसंघातून काँग्रेसच्या दोघांचे चार अर्ज आले आहेत. दोघेही काँग्रेस कार्यकर्ते असल्याने रेणापूर बिनविरोध निघण्याची शक्यता आहे. शिवाय दिलीपराव देशमुख यांच्या विरोधात राकाँच्या भरत चामले यांचा अर्ज आहे. त्यांनीही माघार घेतल्यास या दोन जागा बिनविरोधची शक्यता नाकारता येत नाही. शिरुर अनंतपाळमध्ये राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसच्या विरोधात असून ते उभे राहण्याची शक्यता आहे. शिरूरमधील राष्ट्रवादी नेत्याला सोबत घेतल्यास एक वगळता सर्व जागेवर विरोधकांचे उमेदवार असतील़
भाजपाला मिळाले उमेदवार !
By admin | Updated: April 9, 2015 00:14 IST