लातूर : लातूर जिल्ह्यातही कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे गेल्या महिनाभरात सात ते आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बळीराजा सबलीकरण अभियानाचा उपक्रम हाती घेतला आहे. गावा-गावांत जाऊन शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. अभियानाच्या प्रारंभी शेतकऱ्यांची येत्या शनिवारी कार्यशाळा लातुरात घेण्यात येणार असून, या कार्यशाळेत पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांचे भाषण होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात स्वत: जिल्हाधिकारी बळीराजासमोर जाणार आहेत. गावा-गावांत हा प्रबोधनाचा जागर होणार आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांचे या उपक्रमात बळीराजाला मार्गदर्शन होणार आहे. विविध सेवाभावी संस्था, शाळा-महाविद्यालयांतील एनएसएस कार्यक्रमाधिकारी, नेहरू युवा केंद्र, मानवाधिकार कार्यकर्ते या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)४बार्शी रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बळीराजा सबलीकरण अभियानाचा प्रारंभ म्हणून कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थी, काही शेतकरी उपस्थित राहतील. त्यानंतर प्रबोधनाचा हा जागर गावा-गावांत जाईल.
लातुरात बळीराजा सबलीकरण अभियान
By admin | Updated: December 19, 2014 00:57 IST