बीड : दमदार पावसामुळे बिंदुसरा प्रकल्प तुडूंब भरला आहे. रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्याने पाण्याची साठवणूक क्षमता वाढली आहेत. त्यानुसार शहराला पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने प्रक्रिया सुरू आहे. गेल्या तीन वर्षापासून पाणीपुरवठा बंद असल्याने यंत्रणा खिळखिळी झाली होती. नव्याने ट्रान्सफार्मर उभारून शहराचा पाणीपुरवठा आठ दिवसांवरून चार दिवसावर येणार आहे. त्यामुळे शहरवासियांनाही पालिकेची दिवाळी भेट ठरणार आहे.शहरात पालिकेने राबविलेल्या विकास कामांची माहिती गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. क्षीरसागर म्हणाले, २१ आॅक्टोबरपासून चार दिवसाआड पाणी पुरविण्यास सुरुवात होईल. साडेपाच एकरात क्रीडांगण, महापुरूषांच्या जीवनावर आधारीत सृष्टी शिवाय अद्यावत भाजीमंडई उभारण्यात येत असल्याने शहराच्या वैभवात भर पडणार आहे. कामे अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरवासियांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी उपनगराध्यक्ष नसीमोद्दीन इनामदार, बाबुराव दुधाळ, पाणीपुरवठा सभापती गोपाळ गुरखुदे, अभियंता एम.एस. वाघ उपस्थित होते. नगरपरिषदेने पाच उपक्रम हाती घेतले असून यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. (प्रतिनिधी)
बीडकरांना चार दिवसांआड पाणी
By admin | Updated: October 17, 2016 23:59 IST