गेवराई : शेतकऱ्यांवर कशा न कशाचे तरी संकट येत राहते. कधी पाऊस नसतो तर कधी पाणी नसते. कधी गारपीट होते तर कधी अनुदान मिळत नाही. अशा समस्यातून तग धरून पेरणी झाली. पिके वाढीला लागली असतानाच हरिणांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. सात जुलै रोजी जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. काही भागात पाऊस तर काही भागात नाही अशी परिस्थिती त्यावेळी होती. या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या उरकल्या होत्या. आॅगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला. लावलेल्या बियाणांचे रोपटे झाले असताना शेतकऱ्यांनी बैलगाडीमधून टाकीने पाणी आणून रोपट्यांना पाणी घातले होते. पेरलेले पीक वाया गेले तर पुन्हा आर्थिक संकट ओढावेल या भितीने नियमितपणे या रोपट्यांना शेतकऱ्यांनी पाणी घातले होते. गणपतीच्या आगमनानंतर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली.गेवराई परिसरात धुंवॉधार पाऊस झाल्यामुळे जागोजागचा शेत परिसर पाण्याने भरून गेला होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. आता जवळपास पाऊस ओसरला आहे. पिके गुडग्या ऐवढी वाढली आहेत. अशी सुखकारक स्थिती असताना परिसरातील हरणे शेतामध्ये येऊन धुमाकूळ घालत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.हरिणांवर हल्ला केला किंवा त्यांना मारले तर त्यांचा जीव जाऊ शकतो. परिणामी वन्य प्राण्यांना मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो. या भितीने शेतकरी त्यांना मारायच्या भानगडीत पडत नाहीत. कोणत्याही वेळी हरणे कळपाने येऊन पळत जातात. त्यांच्या पायदळी पिके तुडविली जात असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर, धोंडराई, चकलांबा, मालेगाव , गुळज, राक्षसभुवन कुरण पिंप्री, पाचेगाव, पाडळसिंगी यासह अनेक गावातील पिके हरिणांद्वारे नासधूस केली जात आहेत. तालुका परिसरात जवळपास दहा ते पंधरा हरिणांचे कळप आहेत. काही हरिणे पिके फस्त करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव त्रस्त झाला आहे. पिकांची लागवड झाली. पिके वाढीला लागली आता पुन्हा शेतकऱ्यांना या नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)
बाप्पाच्या निरोपाची तयारी
By admin | Updated: September 6, 2014 23:34 IST