जालना : अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील बाबासाहेब राधाकिसन शेळके यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने संपूर्ण डोमेगावात स्व:ताच्या खर्चातून दिड एकर जमीन विक्री करुन १८० स्वच्छतागृह ेबांधून एक आदर्श निर्माण केला आहे.आपल्या गावात स्वच्छतागृह नसल्याने महिलांसह अबालवृध्दांची होणारी कुचंबना ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत असलेले शेळके यांच्या लक्षात आली. तसेच गावातील स्वच्छतेचा प्रश्न स्वच्छतागृह उभारल्या शिवाय सुटू शकणार नाही, हे लक्षात आले. स्वच्छतागृह उभारणीसाठी शेळके यांनी जनजागृती सुरु केली. परंतु मना ऐवढा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच अखेर कुटुंबियांचा विरोध पत्कारून ३ एकर जमिनीपैकी दीड एकर जमीन विक्री करुन शेळके यांनी स्वच्छतागृह उभारणीचे काम सुुरु केले. शेळके यांनी २०१० साली संपूर्ण गावात १२०० झाडे लावली. ग्रामपंचायतीच्या २ एकर जागेवर वनराई तयार केली. स्वखर्चातून बोअर घेतला व वनराई उत्तमप्रकारे जगविली. स्वत:च्या खिशास झळ सोसून ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. स्वत:च्या खर्चातून वृक्षरोपण, संवर्धन,आणि संपूर्ण गाव त्यांनी हगणदारीमुक्त केले खरे, परंतु सरकारकडून त्यांच्या प्रयत्नांना फारसे सहकार्य मिळाले नाही. आपल्या गावाचा विकास करण्याची जे व्रत शेळके यांनी हाती घेतले ते आजपर्यत चालू आहे. मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही ना कौतूक केले नाही. संपूर्ण गावात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि गावाला हगणदारीमुक्त करणारे बाबासाहेब शेळके यांच्या उल्लेखनीय कामाची दखल औरंगाबाद येथील राज्य समता सेवाभावी संस्थेने घेत शेळके यांना समतारत्न पुरस्कार जाहीर केला आहे.
ध्येयवेडे बाबासाहेब शेळके सरकारी दरबारी दुर्लक्षित
By admin | Updated: September 3, 2014 01:09 IST