औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील परिवहनेत्तर विभागात आर्थिक अनियमितता करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला होता. अखेर याप्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या पथकाकडून लेखापरीक्षण केले जात आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
‘आरटीओत ४१ लाखांचा घोटाळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या प्रकरणी आरटीओ कार्यालयाने चौकशी समिती नेमून चौकशी केली. तसेच लेखा परीक्षणही केले; परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. कोरोना प्रादुर्भाव कमी होताच परिवहन आयुक्त कार्यालयाने आरटीओ कार्यालयातील अपहाराच्या या प्रकाराची गंभीर दखल घेत पथकाद्वारे या प्रकरणी लेखा परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पथकाद्वारे १८ डिसेंबरपर्यंत आरटीओ कार्यालयात हे लेखा परीक्षण चालणार आहे. यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडील अभिलेख्यांची तपासणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी लेखापरीक्षणात काय आढळते, कोणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
असा आहे घोटाळा
अनेक वाहनांचा लाईफ टाईम टॅक्स क्लीअर करण्यात आला. एकूण कराच्या तुलनेत काही हजार रुपयांतील पावती देण्यात आली. मूळ नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या, वित्तपुरवठादाराने कार्यालयात कार्यरत प्रतिनिधींबरोबर संगनमत करुन ओढून आणलेल्या वाहनांचा वित्त बोजा उतरवून वाहने ट्रान्सफर करण्यात आली आहेत. यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे.